शक्तिपीठवरुन सतेज पाटलांचा क्षीरसागर, शिवाजी पाटलांवर निशाणा ! गोकुळवरुन महाडिकांना टोला !!
schedule21 Jul 25 person by visibility 153 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आंदोलन करा, या महामार्गाला पाठिंबा द्या. यासाठी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील असो किंवा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या डोक्यावर बंदूक आहे. असा खळबळ जनक आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. जिल्हा काँग्रेस कमिटी येथे आमदार सतेज पाटील पत्रकारांशी बोलत होते.
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, यांनी आज जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना, गोकुळचा कारभार वाढल्यानेच संचालक संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याच त्यानी सांगितले.
गोकुळची उलाढाल 4 हजार कोटी वर गेली आहे. जनावरांची संख्या वाढली आहे. जिल्हा बँकेची व्याप्ती वाढली म्हणूनच संचालक वाढीचा निर्णय घेतला. सहकाराच्या तरतुदीनुसारच आणि गोकुळचा वाढलेला कारभार पाहता. संचालकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र यावरून महाडिक कुटुंबीय आणि महायुतीतील काही नेते टीका करीत असल्याचा संदर्भ देत, तुझं माझं जमेना. तुझ्याशिवाय करमेना अशी स्थिती सध्या महायुतीमध्ये सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
शक्तीपिठ महामार्गाच्या समर्थनात काही दिवसापूर्वी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल निवेदन त्याचबरोबर चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी शक्तिपीठाच्या समर्थनात केलेल आंदोलन यावर बोलताना त्यांनी, या महामार्गाचं समर्थन करण्याबाबत कदाचित आमदार राजेश क्षीरसागर यांना आदेश आला असेल. खाजगीत ते शक्ती पिठाची गरज आहे का नाही हे अधिक विस्तृतपणे सांगतील. असा टोलाही त्यानी लगावला. सातबारा उतारे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्द केले असतील तर शक्तिपीठाच्या विरोधात एवढ्या हरकती का आल्या असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शक्तीपीठाच्या समर्थनार्थ आंदोलन करा, या महामार्गाला पाठिंबा द्या. यासाठी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील असो किंवा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या डोक्यावर बंदूक आहे. असा खळबळ जनक आरोप आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केला.
दरम्यान माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी काही दिवसापुर्वी गोकुळची निवडणूक लागण्यापूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मश्रीफ यांच्यावर टोकन वाटपाचा आरोप केला होता. यावर आ सतेज पाटील यांनी
माजी आमदार महाडिक यांचा हा आरोप म्हणजे विनोद असल्याची टीका त्यांनी केली. जिल्ह्यामध्ये जे काही राजकारण झाले, त्यांच्या कार्यकाळामध्ये झाले. पुर्वी पक्षाचे राजकारण होते, त्याला खीळ घालण्याच कामे कुणी केली. पैशाचे राजकारण या जिल्ह्यांमध्ये प्रथम कोणी आणले. याचा इतिहास माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी तपासावा अशी टीका त्यांनी केली.
विधानसभेचे दोन्ही अधिवेशन विरोधी पक्षनेत्या विना पार पडले. विधानसभा विरोधी पक्षनेते निवडण्यासाठी मुख्यमंत्री म्हणतात अध्यक्ष योग्य वेळी निर्णय घेतील. आता योग्य वेळ कधी येणार. यासाठी आता दाते पंचांग बघायचे काय. असा उपवासात्मक टोलाही त्यांनी लागावला.
जैन मठातील सर्व हत्ती वंनतारा या ठिकाणी घेऊन जाण्याचे नियोजन सरकार करत आहे. मात्र हत्ती नेण्यामुळे धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी नमूद केले. याचा सरकारने फेरविचार करावा. दोनशे वर्षाची परंपरा सरकार मोडणार आहे काय. असा सवाल करत, जैन मठातील हत्तींची निगा कशी राखावी याबाबत, सरकारने नियमावली तयार करावी. अशी मागणी केली. तुम्हाला हत्तीच न्यायचे असतील तर शेतकऱ्यांचे नुकसान करणारे हत्ती पकडून घेऊन जावा. असा टोलाही त्यांनी लगावला. जैन मठातील हत्ती वनतारा या ठिकाणी नेण्याचा प्रकार म्हणजे जैन समाजाच्या भावना दुखावणारा असल्याचेही त्यांनी म्हटले.
दरम्यान स्वर्गीय पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील आणि राजेश पाटील हे दोघे बंधू राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना त्यांनी, हे दोघेही आपली भेट घेणार आहेत. त्यांची समजूत काढू. स्वर्गीय पी एन पाटील यांनी काँग्रेस सोडून दुसरा कोणताही विचार केला नाही. त्यामुळे राहुल पाटील आणि राजेश पाटील हे पी. एन पाटील यांचा वारसा चालवत आहेत. काँग्रेस सोडून ते कुठेही जाणार नाहीत. असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी देखील त्यांच्याशी संपर्क केला असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याच्या घटनेचाही आमदार सतेज पाटील यांनी निषेध केला. सरकार विरोधात कोणी बोलाल त्याला आम्ही असेच उत्तर देऊ अशा पद्धतीने दहशत पसरवण्याचे काम सूरू असल्याची टीका त्यांनी केली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र असा नव्हता. लोकशाहीमध्ये हे चालणार नाही. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे ज्या पद्धतीन व्हिडिओ बाहेर आलेत ते पाहता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गरज आता भाजपला संपलेली आहे. अशी धारणा भाजपची झालेली आहे. असेही आमदार पाटील यांनी सांगितले.