काँग्रेसचे 15 नव्हेत 35 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार, यादी तयार जून मध्ये प्रवेशाचा पहिला टप्पा - राजेश क्षीरसागर
schedule25 May 25 person by visibility 638 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : काँग्रेसचे 15 नव्हेत 35 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. टप्प्याटप्प्याने त्या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होईल. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पक्षप्रवेशाचा पहिला टप्पा आहे... विरोधकांच्यावर हळूहळू क्षेपणास्त्र डागत जाऊ... असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. कोल्हापूर येथे रविवारी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी, काँग्रेसमधील नाराज नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशा विषयी स्पष्ट भूमिका मांडली. .
काँग्रेसचे काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी चर्चा सुरू आहे. यासंदर्भात क्षीरसागर यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, " शिवसेनेचे पक्ष नेतृत्व हे कार्यकर्त्यांना बळ देणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीच कार्यकर्त्यांना ताकद पुरवले आहे. काँग्रेसचे अनेक नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. केवळ 15 नाहीत तर 35 नगरसेवक आहेत. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या त्या नगरसेवकांची यादी तयार आहे. जून महिन्यापासून टप्प्याटप्प्याने प्रवेश होतील. पहिला आठवड्यात काही प्रवेश होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून आम्ही सक्षमपणे लढविणार आहोत. निवडणूक जिंकण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या करू. साम दाम दड नीतीचा अवलंब होईल . महापालिका निवडणूक ताकतीने लढवू. कोल्हापूरचा महापौर हा शिवसेनेचा असावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शिवसेनेकडे कार्यकर्त्यांचे फौज आहे. अनेकजण तीस तीस वर्षे शिवसेनेचा निष्ठावंत म्हणून काम करत आहेत. त्या साऱ्यांच्याकडे मी भावी नगरसेवक या नजरेने पाहत आहे."
शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना हद्दवाढ झाली तर निवडणुकीवर बहिष्कार टाकू असे विधान केले होते. पत्रकाराने त्याकडे लक्ष वेधले असता क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूरची हद्दवाढ व्हावी यासाठी आपले नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात हददवाढीविषयी सकारात्मक निर्णय होईल. हददवाड करूनच निवडणूक घ्यावी या मताचा मी ही आहे. मात्र निवडणुकीवर बहिष्कार टाकणे असे म्हणणे उचित नाही. साऱ्यांना बरोबर घेऊन हद्दवाढीचा याचा विषय मार्गे लावला जाईल. ग्रामीण भागातील लोकांनाही विश्वासात घेतले जाईल." पत्रकार परिषदेवेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, रणजीत जाधव, माजी नगरसेवक अजित मोरे राजू हुंबे, किशोर घाटगे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, कमलाकर जगदाळे, दुर्गेश लिंग्रस, अंकुश निपाणीकर मंगला साळोखे ,पवित्र रांगणेकर ज्योती हंकारे, रणजीत मंडलिक, अरविंद मेढे गणेश रांगणेकर किराण अतिग्रे, बाळासाहेब शेलार आद उपस्थित होते.