कारखानदारांची उद्योगमंत्र्यांसोबत भेट ! उद्यमनगरात एफएसआय वाढ, गोकुळ शिरगावमध्ये फायर ब्रिगेड स्टेशन, स्मॅक परिसरातील कचरा डेपो हलविणार !!
schedule09 Sep 25 person by visibility 110 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर कारखानदार व उद्योजकांनी संयुक्तपणे मंगळवारी (९ सप्टेंबर २०२५) उद्योगमंत्री उदय सामंत यांची मुंबईत भेट घेतली. कोल्हापुरातील औद्योगिक वसाहतीतील सोयी सुविधा, कारखानदारांच्या अडचणी संबंधी चर्चा झाली. उद्योगमंत्री सामंत यांनी विविध सरकारी विभागांना सूचना करत कारखानदारांच्या प्रश्नांची सोडवणूक जलदगतीने करावी अशा सूचना केल्या. शिष्टमंडळात स्मॅक, गोशिमा आणि कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशच्या पदाधिकारी व संचालकांचा समावेश होता. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कारखानदारांच्या शिष्टमंडळात गोशिमाचे चेअरमन सुनील शेळके, संजय देशिंगे, स्मॅकचे चेअरमन राजू पाटील, बदाम पाटील, शेखर कुसाळे, दिपक चोरगे, स्वरुप कदम होते. उद्योगमंत्र्यांच्या सोबत झालेल्या चर्चेत या साऱ्यांनी कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्राशी संबंधित प्रश्ने मांडली. विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा आग्रह धरला. कोल्हापुरातील शिवाजी उद्यमनगर परिसरात बांधकामासाठी वाढीव एफएसआय मंजूर करावा. उद्यमनगर मध्ये जागा अपुरी पडत असल्यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर उद्योग विस्तारासाठी परवानगी मिळावी अशी मागणी केली. तसेच उद्यमनगरातील विद्युत वाहिन्या या जमिनीखालून (अंडर ग्राऊंड) कराव्यात. तसेच चांगल्या दर्जाचे रस्ते करावेत अशी मागणी केली.
उद्योगमंत्री सामंत यांनी महापालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधला. उद्यमनगरात चांगले रस्ते कराव्यात.तसेच उद्यमनगरातील वाढीव एफएसआयबाबत प्रस्ताव सादर करावा. अशा सूचना केल्या. एफएसआयचा विषय नगरविकास खात्यांशी निगडीत आहे, स्वतंत्र बैठक घेऊन याप्रश्नी मार्ग काढू असे सांगितले. विद्युत वाहिन्यासंबंधी कार्यवाही करण्याविषयी सकारात्मकता दर्शविली.
शिरोली औद्योगिक वसाहतीमधील स्मॅक भवन शेजारील कचरा डेपो हटवून ती जागा ईएसआय हॉस्पिटलला द्यावी अशा सूचना उद्योगमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. गोकुळ शिरगावमध्ये फायर ब्रिगेड स्टेशन उभारणीला मान्यता दिली. गोकुळ शिरगाव परिसरात सध्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ता खोदाई व इतर कामे करताना रस्त्याखालील पाइपलाइन फुटून कारखानदारीला पाणी पुरवठा बंद होत आहे याकडे कारखानदारांनी लक्ष वेधले. तसेच कॉमन फॅसिलिटी सेंटरवरील दंड माफ करावा असे मागणी केली त्यावर मंत्री सामंत यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. कारखानादारांशी चर्चा करुन हा विषय मार्गी लावा असे सांगितले.