हॅलो… मी, डी.वाय. पाटील बोलतोय ! !
schedule05 Aug 26 person by visibility 465 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन : तीन अभिमत विद्यापीठे, पाच राज्य खासगी विद्यापीठे…१८२ शैक्षणिक संस्था….सध्या या शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एक लाख ५३ हजार इतकी…तर पाच लाखाहून अधिक माजी विद्यार्थी संख्या…आणि २६ हजाराहून अधिक विद्यार्थी…राज्यभर उच्च शिक्षणाचं जाळं निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. ज्ञानदेव यशवंतराव तथा डी. वाय. पाटील…! वयाच्या ९१ व्या वर्षी मंगळवारी चार ऑगस्ट २०२६ रोजी शिक्षण क्षेत्रतील हा ज्ञानदीप मावळला. शिक्षण, सामाजिक, सहकार अशा विविध क्षेत्रातील त्यांचे कार्य अमीट असे. दादा म्हणून ते सर्वपरिचित. खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातील दादा माणूस. अनेकांचे आयुष्य घडविणारे…विविध संस्थांचे आधारवड...पद्मश्रीनी सन्मानित…मोठ मोठी पदे भूषविलेले… राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान लाभलेले. त्याचवेळी कायम माणुसकीचा गोतावळा सांभाळणारे…अशा असंख्य आठवणी मागे टाकत त्यांनी जगाचा निरोप घेतला. २२ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन. २०२२ मध्ये ८८ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्वावर लेख लिहिला होता…दादांच्या निधनानंतर पुन्हा एकदा आठवणींना उजाळा….
‘साधारपणपणे सतरा-अठरा वर्षापूर्वीची गोष्ट. तेव्हा, ‘तरुण भारत’कोल्हापूर ऑफिसमध्ये पत्रकार म्हणून मी काम करत होतो. उमेदीचा काळ होता. वेगवेगळया विषयावर लिहायचं, नव्या संस्था, व्यक्तींशी संपर्क साधायचा हे नित्याचं काम. दैनिकात रोज माझ्या नावांनी वेगळी बातमी प्रसिद्ध व्हावी ही धडपड असायची. नुकतेच नव्या शैक्षणिक वर्षारंभाला सुरुवात झाली होती. गरीब, गरजू आणि हुशार मुलांना अर्थसहाय्य करणाऱ्या, शैक्षणिक पालकत्व स्विकारणाऱ्या सामाजिक संस्थेच्या कार्यावर लेखमालिका लिहायला सुरुवात केली होती. रोज एका संस्थेच्या कार्यावर वेगळया पद्धतीने लिहायचो. जवळपास दहा दिवस लेखमालिका चालविली. संस्थेचे कौतुक आणि गरजू मुलांना मदत व्हावी ही त्यामागील भावना होती. या लेखमालेतंर्गत ‘डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक, सामाजिक ट्रस्ट’या संस्थेवर सविस्तर लिखाण केले होते.
त्यावेळी मी, राहायला जुनी मोरे कॉलनी, नाळे कॉलनी परिसरात राहायला होतो. घरी दूरध्वनी होता. आतासारखा तेव्हा मोबाइलचा जमाना नव्हता. दूरध्वनीची अजून चलती होती. एके दिवशी, दूरध्वनी खणाणला. रिसिव्हर उचलून हॅलो म्हणण्याअगोदरच, पलीकडून आवाज आला. ‘हॅलो ! मी, डी. वाय. पाटील बोलतोय !!’क्षणभर मला काही सुचेना. डॉ. डी. वाय. पाटील आणि मला फोन, सारं काही अविश्वनीय. मनाला न पटणार. कारण मी, पत्रकारितेत नवीन. बातमीदार म्हणून काम करायला सुरुवा करुन काही वर्षे झालेली. त्या अर्थी माझ्या पत्रकारितेचा तो उमेदीचा काळ होता.
दुसरीकडे डॉ. डी. वाय. पाटील हे शिक्षण क्षेत्रातील मोठं नाव. त्यांच्या शैक्षणिक-सामाजिक कार्याविषयी प्रचंड ऐकून होतो. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीला आकार दिलेला, मेडिकल-इंजिनीअरिंग कॉलेजची फी माफ केलेली. अनेकांच्या आयुष्य घडलेले. मेडिकल, इंजिनीअरिंग कॉलेजचा भव्य कँम्पस डोळयासमोर तरळत होता. मात्र त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा, बोलण्याचा कधी योग आला नव्हता. त्यांच्याशी कधी भेट झाली नव्हती. यामुळं व्यक्तिगत ओळख तर खूप लांबची गोष्ट. फोनवर ‘नमस्कार दादा’असं म्हणालो. त्यांनी, बातमी वाचून फोन केला होता. लिखाणाबद्दल कौतुकही केले. आणि फोन ठेवताना म्हणाले, ‘भेटायला या’. मी हो म्हणत फोन ठेवला. फोन ठेवल्यानंतर माझ्या मनात विचारांच काहूर निर्माण झालं. एवढा मोठा माणूस अन् माझ्यासारख्या नवख्या पत्रकाराला फोन. भेटायला या असं आवर्जून सांगण. हे सारं न पटणार. मिडियातील कोणा सहकाऱ्याला माझी चेष्टा करायची लहर आली असावी का ? अशी शंकाही मनाला चाटून गेली.
काही वेळ जाताच, पुन्हा दूरध्वनी वाजला. एका कर्मचाऱ्यांनी काही मिनिटापूर्वी झालेल्या संभाषणाचा संदर्भ दिला आणि ‘डी.वाय. दादांनी भेटायला बोलावलय, केव्हा येताय’ असं पुन्हा एकदा विचारलं. ‘हो, येतो’असं म्हणत फोन ठेवला. मात्र त्यांच्याविषयी आदराची भावना, माझा पत्रकारितेतला नवखेपणा यामुळे तेव्हा त्यांना प्रत्यक्ष भेटायला जाण्याचं धारिष्ट्य माझ्या अंगी काही निर्माण झालं नाही. तो क्षण पुन्हा काही जुळून आला नाही.
दरम्यान डॉ. डी. वाय. पाटील आणि माझं पहिलं संभाषण या पद्धतीने झालं होतं. ते माझ्यासाठी एका अर्थी संस्मरणीय ठरलं. पुढे बातमीदार म्हणून ‘तरुण भारत, महाराष्ट्र टाइम्स’मध्ये काम करत असताना विविध समारंभ, कार्यक्रम, पुरस्कार वितरण सोहळयाच्या वृत्ताकंनाच्या निमित्ताने त्यांना अनेकदा ऐकण्याचा योग आला. त्यांच्यासंबंधी दुसऱ्यांची भाषणं ऐकली. या साऱ्या काळात त्यांच्याविषयी आदरभाव वाढतच गेला. उच्च शिक्षण क्षेत्रातील त्यांचे काम, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विस्तार, राज्याच्या विविध भागात निर्माण झालेलं शैक्षणिक जाळं हे सारं थक्क करणार. स्वत:चा लौकिक, कार्यक्षेत्र विस्तारत असताना त्यांनी जवळच्या माणसांना मोठं केले, सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे आधारवड बनले. नवोदित, होतकरु तरुणांच्या पाठीवर आशिर्वादाचा हात ठेवला,त्यामुळे इंजिनीअर, डॉकटर, प्राध्यापक म्हणून अनेकांचे करिअर घडले.
खरं तर, राजकारण हा साऱ्यांच्या आवडीचा प्रांत. एकदा का राजकीय क्षेत्रात पदार्पण झालं की अनेकांना खुर्चीचा, सत्तेचा मोह सुटत नाही. मात्र डी. वाय. पाटील यांनी ऐनभरात राजकारणाला राम राम करत शैक्षणिक, सामाजिक कार्यात झोकून दिलं. शिक्षण क्षेत्रात हिमालयाच्या उंचीची कामगिरी केली. एका मराठमोळा माणूस अतिशय मेहनतीने, जिद्दीने, दूरदृष्टीपणाने आपलं कर्तबगारीचं विश्व निर्माण करु शकतो याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉ. डी. वाय. पाटील ! !
- आप्पासाहेब माळी (पत्रकार, महाराष्ट्र न्यूज वन. कॉम)