ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे " संतांचे संगती " निरुपणास प्रारंभ
schedule04 Aug 26 person by visibility 27 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : देणेची पंथे चालू जाता..... न पडेची गुंता कुठे काही... मार्गाद्वारे वर्तावे ....विश्व मोहरे लावावे.. या ज्ञानेश्वर माऊलींच्या पंक्तींप्रमाणेच आज धकाधकीच्या जीवनात भक्ती ही एकच अशी वाट आहे जी आपल्याला आपल्या आनंदापर्यंत घेऊन जाते. असे जीवनाचे सार निरुपणकार रोहिणी परांजपे यांनी सांगितले.
औचित्य होते ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम तर्फे आयोजित " संतांचे संगती " या निरूपण सोहळ्याचे. ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम,कोल्हापूर चित्पावन संघ आणि कऱ्हाडे ब्राह्मण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय वा.रा तथा दादा धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त " संतांचे संगती" या विशेष निरूपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी, चार ऑगस्ट रोजी या निरूपण सोहळ्यास प्रारंभ झाला. कार्यक्रम राम गणेश गडकरी सभागृह,पेटाळा येथे पार पडला.
निरुपणाची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या अष्टकाने झाली. जय जय राम कृष्ण हरीच्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. सोहळ्याचे औपचारिक उद्घाटन डॉ.राधिका जोशी आणि डॉ. मानसी दिवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे अध्यक्ष डॉ. दीपक आंबर्डेकर यांनी प्रास्ताविक केले.ते म्हणाले ' पाच दिवस चालणाऱ्या या निरूपणामध्ये संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या अलौकिक गाथा दररोज सांगण्यात येणार आहेत. तरी आत्मानंद देणाऱ्या या भक्तीमय सोहळ्याचा लाभ आवर्जून घ्यावा. यावेळी मंगलाधामचे उपाध्यक्ष किरण धर्माधिकारी चित्पावन संघाचे प्रसाद भिडे , श्रीकांत लिमये , मिलिंद पावनगडकर , नंदकुमार मराठे,श्रीराम टोपकर, सचिन जिल्हेदार, संतोष कोडोलीकर, धर्मराज पंडित, डॉ. उदय कुलकर्णी , अनिरुद्ध जावडेकर , अनुराधा गोसावी, अशोक जोशी आदी उपस्थित होते.