श्री महालक्ष्मी अन्नछत्रचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान, भारत सरकारकडून प्रमाणपत्र प्रदान
schedule20 Jun 25 person by visibility 16 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये गेली १७ वर्षे करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी परगावाहून आलेल्या भाविकांना मोफत भोजन प्रसाद देणाऱ्या श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली. संस्थेच्या अन्नदानाच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारकडून संस्थेला ‘भोग प्रमाणपत्र’ देऊन गौरविण्यात आले आहे. अन्न व औषध विभागातील हा सर्वोच्च सन्मान आहे.
अखंड आणि अविरत चालू असलेल्या अन्नदानाच्या या सेवाव्रताबद्दल संस्थेला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. संस्थेला मिळालेल्या प्रमाणपत्राविषयी अन्नछत्रचे संस्थापक राजू मेवेकरी म्हणाले, ‘आता संस्थेने अजून एक यशस्वी पाऊल पुढे टाकत आपल्या अतुलनीय कार्यात एक असामान्य असा मानाचा तुरा खोवला आहे. भारतीय खाद्य सुरक्षा मानक प्राधिकरणाने घालून दिलेल्या निकषानुसार स्वच्छता, सुरक्षितता आणि सात्विकता या अन्नछत्रच्या वैशिष्ट्यांमुळे स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्रालयाकडून हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यासाठी कोल्हापूर अन्न व औषध प्रशासनाचे सहकार्य लाभले. हे प्रमाणपत्र देण्याआधी अन्न व औषध विभागाच्या पथकाने श्री महालक्ष्मी अन्नछत्र येथे येऊन पाहणी केली. त्यांच्या सर्व निकषास पात्र ठरल्यामुळे संस्थेला हे प्रमाणपत्र दिले आहे.’