संशोधकांनी जिथे समस्या आहेत त्या ठिकाणी संशोधनाला प्राधान्य द्यावे-डॉ. अभय बंग
schedule19 Jun 25 person by visibility 62 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘लोकांचे जीवनमान बदलण्यासाठी संख्याशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे संख्याशास्त्रज्ञांनी स्वतःच्या परीघाबाहेर जाऊन सामाजिक समस्यांचा शोध आणि वेध घेतला पाहिजे. व्यापक सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने संख्याशास्त्राचा वापर केला जाणे गरजेचे आहे. संशोधकांनी सुविधांनी सुसज्ज ठिकाणी जाण्याऐवजी जिथे समस्या आहेत, अशा ठिकाणी जाण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. तिथे समस्या सोडवणुकीच्या अनेक शक्यता सामोऱ्या येतात.’ असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत डॉ. अभय बंग यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात ‘अॅडव्हान्सेस इन स्टॅटिस्टिकल मेथड्स, डेटा सायन्स अँड ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स’ या विषयावरील तीन दिवसीय संख्याशास्त्र आंतरराष्ट्रीय परिषदेस गुरुवारी (१९ जून) प्रारंभ झाला. त्यावेळी बीजभाषण करताना डॉ. बंग बोलत होते. अमेरिकेतील मिसीसिपी स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रा. डॉ. प्रकाश पाटील यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
डॉ. अभय बंग यांचे ‘लोकांसमवेत संशोधन’ या विषयावर अतिशय प्रबोधक बीजभाषण झाले. संख्याशास्त्रज्ञांसह सर्वच संशोधकांसाठी त्यांनी आपल्या गडचिरोली येथील सोसायटी फॉर एज्युकेशन, अॅक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ (सर्च) या संस्थेमध्ये आदिवासी समाजाच्या संदर्भात केलेले विविध आरोग्यविषयक प्रयोग व प्रकल्पांमध्ये संख्याशास्त्र कसे उपयुक्त ठरत गेले, याविषयी सादरीकरण केले. साऱ्या भवतालात लोकांचे काय, हा प्रश्न घेऊन जो उभा राहतो, तो खरा संशोधक असतो. संशोधकांनी लोकांसमवेत संशोधन हा मार्ग स्वीकारला पाहिजे. महात्मा गांधी यांच्या हिंद स्वराज, ग्राम स्वराज या पुढे जाऊन या देशामध्ये आरोग्य स्वराज निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ डॉ. अनिल गोरे, ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी परिषदेच्या स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले. संख्याशास्त्र अधिविभागाचे प्रमुख तथा परिषद समन्वयक डॉ. शशीभूषण महाडिक यांनी स्वागत केले. डॉ. सोमनाथ पवार यांनी आभार मानले.