भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी प्रबुद्ध समाजाने पुढे यावे : शिवप्रकाश
schedule14 Jun 26 person by visibility 35 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गेल्या १२ वर्षांचा कार्यकाळ हा केवळ सत्तेचा प्रवास नसून राष्ट्रउभारणीचे एक महा तप आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या मंत्राच्या आधारे भारताने जागतिक स्तरावर नवे स्थान निर्माण केले आहे. आता भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी प्रबुद्ध समाजानेही पुढे यावे.” असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील १२ वर्षांच्या कार्यपूर्ती निमित्त ‘प्रबुद्ध भारत संमेलन’ उत्साहात झाले. हॉटेल वृषाली येथे आयोजित केले होते.
मार्गदर्शन करताना मा. शिवप्रकाश म्हणाले, जनसंघापासून भारतीय जनता पक्षाने ‘अंत्योदय’ हा विचार केंद्रस्थानी ठेवला आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचे कार्य मोदी सरकारने सातत्याने केले आहे. प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, जल जीवन मिशन, डिजिटल इंडिया यांसारख्या योजनांमुळे कोट्यवधी नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडला आहे. महिला सक्षमीकरण आणि महिला सन्मानाच्या क्षेत्रातही मोदी सरकारने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, उज्ज्वला योजना, मातृत्व लाभ योजना, महिला स्वयं सहायता गटांना दिलेले बळ, तसेच महिलांसाठी संसद व विधानमंडळांमध्ये आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ यांसारख्या निर्णयांमुळे देशातील महिलांचा आत्मविश्वास आणि सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे. भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ बनविण्याच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी समाजातील प्रबुद्ध, सुशिक्षित आणि विचारवंत वर्गाने शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी.'
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रात झालेल्या विविध विकासकामांची आणि उपलब्धींची माहिती उपस्थितांना दिली. खासदार धनंजय महाडिक यांनी आभार मानले. कार्यक्रमास मकरंद देशपांडे, विक्रम पावसकर, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, समरजितराजे घाटगे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, राहुल चिकोडे, योगेश बाचल, मुरलीधर जाधव, माधुरी नकाते उपस्थित होते.