गोकुळच्या इतिहासात गेल्या पाच वर्षात सर्वोत्तम कामगिरी, संचालक मंडळाचे प्रसिद्धीपत्रक
schedule04 May 26 person by visibility 332 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या स्थापनेपासूनच्या गेल्या ६३ वर्षांच्या इतिहासात गेल्या पाच वर्षातील कामगिरी सर्वोत्तम आहे, असे प्रसिद्धीपत्रक दूध संघाच्या संचालक मंडळाने प्रसिद्धीला दिले आहे. दरम्यान; गोकुळ दूध संघाची नाहक बदनामी करू नका, असे आवाहनही या पत्रकात केले आहे.
विद्यमान संचालक मंडळांने पाच वर्षांपूर्वी निवडणूक प्रचारात प्रतिलिटरला दोन रुपये दूध दरवाढ देण्याचे वचन दिले होते. दरम्यान; म्हैशीच्या दुधाला प्रति लिटरला तब्बल १४ रुपये आणि गाईच्या दुधाला प्रति लिटरला तब्बल १० रुपये दूध दरवाढ दिली आहे. संचालक मंडळाने केलेल्या संकल्पानुसार दैनंदिन संकलन १२ लाख लिटरवरून २० लाख लिटर संकलनाचा टप्पा यशस्वीरित्या गाठला. हा ऐतिहासिक टप्पा म्हणजे सभासदांनी विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केलेल्या विश्वासाचे आणि पाठबळाचेच प्रतीक आहे. वार्षिक उलाढाल २५५१ कोटींवरून ४१०० कोटी रुपयावर पोहचली आहे. अधिकृत भाग भांडवल १०० कोटींवरून २५० कोटींवर पोहोचलेले आहे. गुंतवणूक रू. ३२२ कोटींवरून ५९४ कोटींवर पोहोचलेली आहे. कायम मालमत्ता २४२ कोटींवरून ३३९ कोटींवर पोहोचली आहे.
बाजारपेठेत गोकुळचे म्हैस दूध प्रसिद्ध आहे. वाढती मागणी लक्षात घेता म्हैस दूध संकलनामध्ये वाढ करण्यासाठी "स्वर्गीय आनंदराव पाटील- चुयेकर दूधवाढ कृती कार्यक्रम" प्रभावीपणे राबविला. यामुळेच, २० लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक टप्पा गाठण्यात संघाला यश मिळाले. अंतिम दूध दरफरक वाढवताना म्हशीच्या दूध दरातील फरक दोन रुपये पाच पैशांवरून सव्वा दोन रुपये केला. गाईच्या दूध दरातील फरक एक रुपये पाच पैशावरून सव्वा रूपये केला. या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्याला दरवर्षी अकरा कोटी रुपये जादा अदा होतात. दुग्धजन्य पदार्थांची विक्रीही वार्षिक रू. ५० कोटींवरून वार्षिक तब्बल रु.१२५ कोटींपर्यंत पोहोचलेली आहे. पाच वर्षांपूर्वी वार्षिक रु. २१२८ कोटी रुपयांची दूध विक्री आजमीतिला वार्षिक ३६४१ कोटी रुपयावर नेलेली आहे. विशेष म्हणजे सणासुदीला २५ लाख लिटर दूध विक्रीचा टप्पा गाठण्यात संघाला यश मिळालेले आहे.
गोकुळ दूध संघावरील नोकर भरतीचा आरोप धादांत खोटा व अपुऱ्या माहितीवर असल्याचे स्पष्ट करताना पत्रकात म्हटले आहे, या आधीच्या संचालक मंडळाच्या कालावधीत ११३८ नोकर भरती केली होती. विद्यमान संचालक मंडळांने गेल्या पाच वर्षात फक्त ७० तांत्रिक व इतर पदे भरलेली आहेत. आरोप धादांत खोटे.....!