ब्राह्मण समाजाला सरकारकडून घोषणांची नव्हे, उत्तरदायित्वाची गरज ! गोलमेज परिषदेत राज्यव्यापी कृती समितीची स्थापना ! !
schedule04 Jul 26 person by visibility 26 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ब्राह्मण समाजासमोरील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रश्नांच्या सोडवणुकीच्या अनुषंगाने कोल्हापुरात आयोजित ब्राह्मण गोलमेज परिषदेत ‘शिक्षण - कौशल्य विकास, रोजगार उद्योग - आर्थिक – सक्षमीकरण, सामाजिक न्याय व कायदेशीर न्याय, संघटन व राज्यव्यापी समन्वय आणि समाजहिताच्या विषयावर सातत्याने काम’या संबंधी महत्वपूर्ण ठराव करण्यात आले. या परिषदेला २२ जिल्ह्यातून जवळपास शंभर प्रतिनिधींनी सहभाग घेतला. समाजाशी निगडीत विविध विषयासंबंधी सरकार दरबारी पाठपुरावा करणे, राज्यभरात समाज संघटन यासाठी राज्यस्तरीय कृती समितीची स्थापना करण्यात आली. येथील हॉटेल ओपल येथे ही परिषद झाली.
दिवसभर समाजातील विविध घटकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर ऊहापोह झाला. सायंकाळी ठराव मांडले. ‘ब्राह्मण समाजाला घोषणांची नव्हे, उत्तरदायित्वाची गरज’ आहे. त्या अनुषंगाने समाजहितासाठी व्यापक पातळीवर काम करण्यासाठी राज्यव्यापी कृती समितीची स्थापना केली. या कृती समितीचे संस्थापक निखिल लातूरकर आहेत. कृती समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मकरंद कुलकर्णी यांच्याकडे सोपविली. कृती समितीत तीन कार्याध्यक्ष नियुक्त केले. यामध्ये अॅड. मंदार जोशी, सुरेश मुळे, डॉ. मिलिंद संपगावकर यांचा समावेश आहे. ब्राह्मण समाजाशी नियमित संवादासाठी राज्यस्तरीय समन्वय यंत्रणा स्थापन करण्याचे ठरले.
पत्रकारांशी बोलताना मकरंद कुलकर्णी म्हणाले, ‘खुल्या प्रवर्गातील समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी स्थापन केलेल्या अमृत संस्थेकडून समाजाच्या अपेक्षा आहेत. मात्र समाजामध्ये संस्थेच्या कार्यपद्धतीविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव दिसतो. अमृत संस्थेचे अधिकारी एकाधिकारशाहीने वागतात. संस्थेच्या कामकाजात अनियमितता आढळते. तेव्हा अमृतच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि समाजाचा व्यापक सहभाग निश्चित करावा. याशिवाय परशुराम आर्थिक विकास महमंडळ तातडीने पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे. समाजाच्या शिक्षण, रोजगारल व उद्योगासाठी विशेष कृती आराखडा जाहीर करावा. समाजाच्या अपेक्षांना न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू राहील.’ पत्रकार परिषदेवेळी संजय सुपेकर ,प्रदीप अष्टेकर, गणेश देशपांडे, राजेंद्र पोतदार, गणेश लंके आदी उपस्थित होते