यशस्वितेचा षटकार ! महाराष्ट्र न्यूज वनचे सातव्या वर्षात पदार्पण ! !
schedule04 Jul 26 person by visibility 40 categoryसंपादकीय
कोल्हापूर : वस्तुनिष्ठ बातम्या, सडेतोड लेखन, वैविध्यपूर्ण विषयांची हाताळणी, शैलीदार शब्दरचना आणि अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे वास्तवदर्शी मांडणी करत कोल्हापूरकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले, न्यूज पोर्टल म्हणजे, ‘महाराष्ट्र न्यूज वन. कॉम.’. अल्पावधीतच कोल्हापुरातील आघाडीचे न्यूज पोर्टल म्हणून साऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. सहा वर्षाचा यशस्वी टप्पा पूर्ण करुन, ‘महाराष्ट्र न्यूज वन’हे न्यूज माध्यम पाच जुलै २०२६ रोजी सातव्या वर्षात पदार्पण करत आहे. आणि हे सारं शक्य झाले, ते वाचकांच्या पाठबळावर. जाहिरातदारांच्या सहकार्यामुळे हे कृतज्ञतापूर्वक नमूद करावे लागेल.
माध्यम कोणतेही असो त्या क्षेत्रात काम करताना सातत्य आणि विश्वसनीयता या महत्वाच्या गोष्टी. सध्याच्या ‘ब्रेकिंग न्यूज’च्या या जमान्यात सर्वात अगोदर वाचकापर्यंत बातमी पोहोचविताना विश्वासार्हता ही तितकीच महत्वाची. ‘महाराष्ट्र न्यूज वन’ने नेहमीच वस्तुनिष्ठ बातमीदार करत वाचकांचा विश्वास संपादन केला. ‘महाराष्ट्र न्यूज वन. कॉम’ची सुरुवात ही कोरोना काळातील. २०२० मधील. कोरोना आणि लॉकडाऊनचा कालावधी हा साऱ्यांचाच कसोटीचा काळ. साऱ्या जीवांची परीक्षा पाहणारा. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे समाजजीवनाचे, जगण्याचे चक्र थांबल्यासारखी स्थिती बनली होती. बाजारपेठा सुरू नव्हत्या. कारखाने बंद, उद्योगजगताची चक्रे थंडावली होती. व्यवसाय ठप्प होता. अनेकांचे रोजगार हिरावले होते. समाजजीवनाशी निगडीत प्रत्येक क्षेत्रावर, घटकावर कोरोनाचा दुप्षरिणाम जाणवत होता.
अशा कठीण काळात पाच जुलै २०२० रोजी ‘महाराष्ट्र न्यूज वन. कॉम’या न्यूज् पोर्टलची सुरुवात झाली. डिजीटल माध्यम. या नवं माध्यमात पाऊल टाकताना पत्रकारितेच्या क्षेत्रातील दोन दशकाचा अनुभव पाठीशी होता. मात्र पोर्टलचे माध्यम नवीन, तंत्रज्ञानाशी निगडीत. त्या साऱ्या गोष्टी आत्मसात करत ‘महाराष्ट्र न्यूज वन. कॉम’ची सुरुवात झाली. अनेकांच्या सदिच्छा, मदतीसाठी हात या जमेच्या बाजू होत्या. प्रारंभीच्या कालावधीत अनेकांनी जाहिरातीच्या माध्यमातून बळ दिले. यामुळे महाराष्ट्र न्यूज वनची वाटचाल दिमाखात सुरू राहिली. बातमीदार म्हणून विविध संस्था, संघटनाशी स्नेह जुळलेला. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, राजकीय, उद्योग, शिक्षण क्षेत्रात सक्रिय मंडळीशी जवळीक निर्माण झालेली. त्या साऱ्यांचेच मला सहकार्य लाभले.
महापालिका, जिल्हा परिषद, शिवाजी विद्यापीठ, सहकार, सांस्कृतिक , साहित्यिक, उद्योग विश्वातील घडामोडी वाचकापर्यंत पोहोचविण्याला प्राधान्य दिले.‘महाराष्ट्र न्यूज वन. कॉम.’मधील बातमी म्हणजे विश्वसनीय, वस्तुनिष्ठ असे जणू समीकरण बनले. जे मांडायचे ते स्पष्टपणे. परखडपणे. चांगल्याचे कौतुक आणि चुकीवर प्रहार हे सूत्र ठरलेले. यामुळे ‘महाराष्ट्र न्यूज वन’च्या वाचक संख्येत दिवसेंगणिक वाढ होत गेली. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा वर्षाचा टप्पा पार करत ‘महाराष्ट्र न्यूज वन’ पाच जुलै २०२६ रोजी सातव्या वर्षात पदार्पण करत आहे. यापुढेही वाचकांचे, जाहिरातदारांचे पाठबळ कायम राहील. वाचकांशी, कोल्हापूरकरांशी जुळलेला हा स्नेह कायम वृ़ध्दिगंत होत राहील हा विश्वास आहे. शिवाय भविष्यकाळातील कार्यासाठी बळ निर्माण करणारा आहे.
- आप्पासाहेब माळी (पत्रकार, महाराष्ट्र न्यूज वन. कॉम)