सहकार गौरव पुरस्कार सोहळा; आमदार विनय कोरे यांना सहकार भूषण पुरस्कार ! विद्याधर अनास्कर ठरले सहकार महर्षी !!
schedule04 Jul 26 person by visibility 58 categoryउद्योग
सहकाराला राष्ट्रीय स्तरावर धोरणात्मक महत्त्व –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाराष्ट्राने सहकार चळवळीचे मर्म शंभर वर्षांपूर्वीच समजून घेत शेतकऱ्यांना आर्थिक बळ दिले. आजही सहकार हेच ग्रामीण विकासाचे सर्वात प्रभावी साधन ठरत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ मिळत आहे. शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्ज व विकास पोहोचविण्यात सहकारी संस्थांची भूमिका निर्णायक ठरत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि सहकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सहकार व गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, वारणा सहकार समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे, आमदार चित्रा वाघ, आमदार अभिजित पाटील, आमदार संजय भेंडे, राज्य सहकारी संघाचे संचालक शिवाजीराव नलावडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर, प्रकाश दरेकर उपस्थित होते.
पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांना ‘सहकार महर्षी पुरस्कार’, वारणा सहकार समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांना ‘सहकार भूषण पुरस्कार’, भगिनी निवेदिता सहकारी बँक, पुणेच्या अध्यक्षा डॉ. रेवती पैठणकर यांना ‘सहकार रत्न पुरस्कार’, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिपक पटवर्धन यांना ‘सहकार गौरव पुरस्कार’, अण्णासाहेब सावंत नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षा शोभाताई सावंत यांना ‘महिला सहकार शक्ती पुरस्कार’ तसेच सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांना ‘सहकार विभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राने सहकार चळवळीचे मर्म खूप पूर्वी ओळखले होते. सव्वाशे वर्षांपूर्वीपासून सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सावकारांच्या जाचातून मुक्त करण्याचा प्रयत्न सुरू झाला. पहिली सहकारी पतपेढी १९०४ मध्ये उभी राहिली, तर १९११ मध्ये शिखर बँकेची स्थापना झाली. धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे-पाटील, वैकुंठभाई मेहता यांसारख्या अग्रणी व्यक्तींनी सहकाराला दिलेल्या दिशा-निर्देशांचे स्मरण यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज महाराष्ट्रात दोन लाखांहून अधिक सहकारी संस्था कार्यरत असून सहकाराचे सर्वाधिक व्यापक जाळे हे याच राज्यात आहे. सहकार क्षेत्राची खरी ताकद ओळखून ६ जुलै २०२१ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात पहिल्यांदाच स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केले पूर्वी सहकाराला फक्त काही राज्यांपुरती मर्यादित चळवळ म्हणून पाहिले जात होते. मात्र, आता सहकाराला राष्ट्रीय स्तरावर धोरणात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पहिल्या केंद्रीय सहकार मंत्रिपदासाठी निवड झाल्याने सहकार क्षेत्राला दूरदृष्टी आणि अनुभव लाभला आहे.राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर करून पुढील २० वर्षांत देशाच्या ‘जीडीपी’मध्ये सहकार क्षेत्राचा हिस्सा तीन पट वाढवण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे.