कोल्हापुरातही शिवसेनेने दुसरे मंत्रीपद द्यावे - सुजित चव्हाण
schedule15 Apr 26 person by visibility 31 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ विधानसभा निवडणुकीत दिलेल्या शब्दांची वचनपूर्ती करण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या रूपाने मंत्रीपद दिले गेले. परंतु, शहर आजही मंत्री पदापासून वंचित आहे. इतर जिल्ह्यात पक्षाचे दोन – दोन मंत्री आहेत. त्याप्रमाणे कोल्हापुरातही पक्षाने दुसरे मंत्रीपद द्यावे’ अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी केले आहे.
शिवसेना शहर कार्यायल येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. आमदार राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी बोलताना चव्हाण म्हणाले, ‘ गेली ४० वर्षे आम्ही शिवसेनेचे प्रामाणिकपणे काम केले आहे. पण, नंतर आलेली काही लोक पक्षनेतृत्वावर शंका उपस्थित करून शिवसेनेतील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेना पक्षवाढीसाठी एक पाऊल मागे घेण्याची भूमिका नेहमीच शिवसैनिकांची राहिली आहे. पण, डावलले जात असल्याची भावना काही नवख्या पदाधिकाऱ्यांकडून होत असल्याने शिवसैनिकांत संभ्रम निर्माण होत आहे. महापालिका निवडणुकीतही शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करण्याचा उद्देश ठेवून अनेक सक्षम पदाधिकाऱ्यांनी हक्क असूनही माघार घेतली.
महापालिका निवडणुकीत शिवसैनिकांऐवजी नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली. याची खंत शिवसैनिकांच्या मनात आहे. शिवसैनिक न्यायाच्या प्रतीक्षेत असतानाही काही पदाधिकारी पक्षनेतृत्वावर शंका उपस्थित करून, एकप्रकारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात. ही पद्धत चुकीची असून, पक्षाच्या अस्मितेला गालबोट लागण्याचा हा प्रकार आहे. कोल्हापूर शहराला मंत्रीपद मिळावे ही इच्छा आहे. तशी मागणीही वारंवार केली जात आहे. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या शब्दांची वचनपूर्ती करण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या रूपाने मंत्रीपद दिले गेले. परंतु, शहर आजही मंत्री पदापासून वंचित आहे. इतर जिल्ह्यात पक्षाचे दोन – दोन मंत्री आहेत. त्याप्रमाणे कोल्हापुरातही पक्षाने दुसरे मंत्रीपद द्यावे.’ अशी मागणी चव्हाण यांनी केली.