नवीन आलेल्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची कार्यपद्धती अवलंबणे गरजेचे, निष्ठेला योग्य न्याय मिळतो
schedule15 Apr 26 person by visibility 240 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : मी १९८६ पासून गेली ४० वर्षे शिवसेनेत एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणे काम केले. पण, मंत्री पदाची संधी अजून मिळाली नाही. परंतु, नाराज न होता किंवा पक्षनेतृत्वावर कोणतीही टीका- टिपण्णी न करता आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतुत्वाशी एकनिष्ठ राहून काम करत आहे. शिवसेनेच्या जडणघडणीत जेष्ठ शिवसैनिकांचे मोठे योगदान असून, त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य न्याय देतील. त्यामुळे पक्षनेतृत्वावर कोणीही शंका घेवू नये. शिवसेनेत निष्ठेला योग्य न्याय मिळतो, अशी भावना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे बी.एल.ओ. नेमणूकीसंदर्भात आज पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक पार पडली या दरम्यान ते बोलत होते.
आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्तुत्ववान नेतृत्व आहे. ते सर्वांना न्याय देणारेच आहेत. शहरातील वातावरणावर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तयार होते हे सत्य आहे. गेली ४० वर्षे एकनिष्ठपणे आपण सर्वांनी मिळून काम केले आहे. ४० वर्षापूर्वीचा काळ बघितला तर ग्रामीण भागात शिवसेनेचा बोर्ड लावल्याक्षणी काढला जायचा. या संघर्षाच्या काळात स्वर्गीय रामभाऊ चव्हाण, शिवाजीराव जाधव, माजी आमदार सुरेश साळोखे, चंदूभाऊ साळोखे, विनायक साळोखे अशा कट्टर शिवसैनिकांच्या साथीने शिवसेनेचे रोपटे रोवले गेले. पक्षासाठी अंगावर गुन्हे घेणारे कार्यकर्ते फक्त शिवसेनेतच दिसतील. याच रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. त्यामुळे जेष्ठ शिवसैनिकांचे पक्षासाठी असलेले योगदान डावलता येणार नाही. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाचविण्यासाठी उठाव केला त्या पहिल्या दिवसापासून आपण सर्वजण एकत्र येवून पाठीशी ठाम उभे राहिला आहे. शिवसेनेच्या वाढीमध्ये योगदान दिलेल्या प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकाचा विविध पदांवर पहिला हक्क आहे. त्यामुळे निष्ठावंताना न्याय देण्याची भूमिका आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडणार आहे.
मंत्री पद मिळाले नाही म्हणून मी कधीच पक्षनेतृत्वावर शंका घेतली नाही आणि घेणारही नाही. कारण शिवसेनेत निष्ठेला योग्य न्याय मिळतो. नवीन आलेल्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची कार्यपद्धती अवलंबणे गरजेचे आहे. नवीन आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच महापालिका निवडणुकीत झाला आहे. पण त्यांनीही संयम ठेवणे गरजेचे आहे. पक्षाची बदनामी होईल असे कोणतेही वक्तव्य करू नये. महापालिका निवडणुकीत काळजावर दगड ठेवून काही निर्णय घ्यावे लागले. पण, निकालानंतर ते निर्णय योग्य असल्याचे दिसून आले आहे. ज्या ज्या शिवसैनिकांनी निवडणुकीत हक्काचा त्याग केला त्या सर्व शिवसैनिकांना येणाऱ्या काळात विविध महामंडळे, समित्यांवर सन्मानपूर्वक स्थान देण्यात येईल. विधानसभा निवडणुकीत पेठांनी सुमारे ५० हजारांचे मताधिक्य दिले आणि विजयात मोलाची भूमिका बजावली. महापालिका निवडणुकीतही दोन - तीन ठिकाणी वगळता सर्व ठिकाणी महायुतीच्याच उमेवाराना पेठांमधील जनतेने विजयी केले. ही मी केलेल्या कामाची पोहच पावती असून, शिवसेनेवरील विश्वास आहे.
पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांचीही भूमिका अत्यंत महत्वाची असून, त्यांनी शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी योग्य निर्णय घेतले पाहिजेत. जेणेकरून खदखद निर्माण होणार नाही. नवीन आलेल्या पदाधिकाऱ्यांनी संयम ठेवावा. जुना- नव्या पदाधिकाऱ्यांनी मिळून शिवसेना एक कुटुंब असल्याची भागणा ठेवावी. कोणीही विचलित होवू नये. शिवसेनेत निष्ठेला योग्य न्याय मिळतो. त्यामुळे पक्षनेतृत्वावर कोणीही शंका घेवू नये, असे आवाहन केले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांचेही भाषण झाले
यावेळी महानगरप्रमुख शिवाजीराव जाधव, रणजित जाधव, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, दीपक चव्हाण, परिवहन सदस्य रोहन अतिग्रे, पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, पूजा भोर, पूजा कामते, जिल्हा समन्वयक कमलाकर जगदाळे, सुनील जाधव, हर्षल सुर्वे, निलेश हंकारे, अंकुश निपाणीकर, राजू पवार, आदर्श जाधव, सचिन क्षीरसागर, अर्जुन संकपाळ, सौरभ कुलकर्णी, धैर्यशील जाधव, नितीन मुधाळे, विनोद हजारे उपस्थित होते.