निसर्गाची हानी न करता केलेला विकास हा खऱ्या अर्थाने शाश्वत विकास – कुलसचिव व्ही. एन. शिंदे
schedule18 Feb 26 person by visibility 57 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ निसर्गाची हानी न करता केलेला विकास हा खऱ्या अर्थाने शाश्वत विकास असतो.’असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. एन.शिंदे यांनी व्यक्त केले.
येथील संत गाडगे महाराज अध्यासन व करवीर साहित्य परिषद कोल्हापूरतर्फे पुरस्कार वितरण समारंभ बुधवारी, १८ फेब्रुवारी पार पडला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलसचिव शिंदे बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे विश्वस्त एम .बी शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये पुरस्कार वितरण समारंभ झाला. संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कार भास्कर पेरे पाटील यांना तर रा. तु. भगत जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांना प्रदान करण्यात आला. संत गाडगे महाराज समाज सहाय्यता पुरस्कार व्हाईट आर्मी समूह कोल्हापूर यांना देण्यात आला. अशोक रोकडे यांनी तो स्वीकारला. याप्रसंगी साहित्यिकांचाही सत्कार करण्यात आला.
कुलसचिव शिंदे म्हणाले,‘ नेतृत्व म्हणजे सत्तेचा वापर नव्हे तर ती खऱ्या अर्थाने सेवेची संधी आहे आणि हेच काम पेरे पाटील यांनी केले. लोकांचा विश्वास मिळवला. लोकांच्या सहभागातून गाव एका उंचीवर नेऊन ठेवले.’ रयत शिक्षण संस्थेचे विश्वस्त डॉ. एम बी शेख यांनी, ‘आजचं युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. आपण कितीही नाही म्हटलं तरीही आपल्याला या तंत्रज्ञानाचा वापर ही गरज बनलेली आहे. जर आपल्याला प्रवाहाबरोबर जायचं असेल तर टेक्नॉलॉजीचा वापर करणं ती शिकून घेणं ही काळाची गरज आहे.’असे नमूद केले. संत गाडगे महाराज अध्यासनाचे अध्यक्ष एस. एन. पाटील यांनी प्रास्ताविक केले. करवीर साहित्य परिषदेच्या अध्यक्ष डॉ सरोज बिडकर यांनी मानपत्राचे लेखन व वाचन केले आहे. श्रद्धा पाटीलने सूत्रसंचालन केले. एम डी देसाई यांनी आभार मानले. याप्रसंगी प्राचार्य जी. पी. माळी, डॉ. चांगदेव बंडगर, प्रा. जे.के. पवार, प्रा. जॉर्ज क्रूझ, सिद्धेश एस भगत, निलिमा व्ही. सावंत, जयश्री दानवे, श्रीमती आरती भागवत, ॲड. पुष्पा पाटील, डॉ. जयश्री तेली, प्रणिता शिपूरकर,उपस्थित होते.