सीआयआय -अॅग्री इनोव्हेशन समिट उत्साहात, डीवाय पाटील कृषी - तंत्र विद्यापीठात आयोजन
schedule30 May 26 person by visibility 28 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कृषी क्षेत्रात नवोन्मेषाला चालना देणे, काढणीनंतरच्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविणे, मूल्यवर्धित उत्पादनांद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न उंचावणे आणि युवा पिढीला कृषी उद्योजकतेकडे आकर्षित करणे ही काळाची गरज आहे. उद्योग, शासन, संशोधन संस्था आणि शेतकरी यांच्यातील सशक्त समन्वयातूनच भारतीय शेती अधिक उत्पादक, स्पर्धात्मक आणि जागतिक स्तरावर सक्षम होऊ शकते, असे प्रतिपादन महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे (एम. ए. आय.डी. सी.)चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) दक्षिण महाराष्ट्र झोन यांच्यावतीने डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे ‘सीआयआय -अॅग्री इनोव्हेशन समिट २०२६’ मध्ये विशेष मार्गदर्शन करताना काकडे बोलत होते. चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला विद्यापीठाचे प्र-कुलपती ऋतुराज संजय पाटील, सीआयआय दक्षिण महाराष्ट्र झोनल कौन्सिलचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सीआयआय दक्षिण महाराष्ट्र झोनल कौन्सिलचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील यांनी स्वागतपर भाषणात विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश चितळे म्हणाले, परिषदांमुळे शेतकरी, कृषी उद्योजक आणि युवकांना नव्या संधींची माहिती मिळून कृषी क्षेत्रातील नवकल्पनांना चालना मिळते. ‘विकसित भारत 2047’ या राष्ट्रीय ध्येयाच्या पूर्ततेमध्ये कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहील असा विश्वास त्यानी व्यक्त केला.
कुलगुरू डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी हरित, धवल आणि निळ्या क्रांतीचा उल्लेख करत भारताच्या कृषी विकासाचा आढावा घेतला. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, गोकुळ व नॅशनल डेअरी असोसिएशनचे संचालक डॉ. चेतन नरके, पीडीके एएसएम कन्सल्टिंगचे व्यवस्थापकीय संचालक आबासाहेब काळे आबासाहेब काळे, सारंग जाधव आणि आदित्य बेडेकर यांनी विचार मांडले.
प्रा. शुभदा यादव आणि प्रा. प्रियंका पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सीआयआयचे दक्षिण महाराष्ट्र झोनल कौन्सिलचे उपाध्यक्ष मल्हार भांदुर्गे यांनी आभर मानले. डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. मंगल पाटील , अधिष्ठाता - सिडीसीआर प्रा. सुदर्शन सुतार, सीआयआय सचिव राजाराम काळे उपस्थित होते.