कागदावरच्या बोगस दूध संस्था रद्द करा, अन्यथा त्यांच्याच सात पिढ्या गोकुळवर राज्य करतील
schedule28 Apr 26 person by visibility 31 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘काही पुढाऱ्यांनी एक एक चांगल्या संस्था हाताशी धरून कमीत कमी पाच ते सहा संस्था काढल्या आहेत. महिन्यातून एकदा फक्त या नवीन संस्थेच्या नावावर संघात दूध घालायचे व मताला पात्र करून ठेवायचे असेही प्रकार सध्या जोरात सुरू आहेत. त्यामुळे मागील दैनंदिन संकलन रिपोर्ट पाहणे गरजेचे आहे. ही तपासणी योग्य रित्या नाही झाली तर याच्याच सात पिढ्या गोकुळ मध्ये सत्ताधारी म्हणून राहतील. या पाच वर्षात स्थापन झालेल्या संस्थांची आकडेवारी हा आपल्या सात पिढ्यांची सोय करण्याचा एक भाग आहे. त्यामुळे संस्थेची सखोल तपासणी करावी अन्यथा आम्हाला आमचे अस्तित्व टिकवण्यासाठी मोर्चा काढावा लागेल.’असे पत्रक करवीर तालुक्यातील नांदगाव येथील श्री हनुमान दुध व्यावसायिक सहकारी संस्था, श्री सिध्देश्वर दुध व्यावसायिक सहकारी संस्था, श्री सरस्वती महिला दुध व्यावसायिक सहकारी संस्था व भुदरगड तालुक्यातील बामणी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी दुध व्यावसायिक सहकारी संस्थांच्या चेअरमनांनी प्रसिद्धीस दिले आहे.
पत्रकात म्हटले आहे, ‘कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला संलग्न असलेल्या सुमारे १२०० दूध संस्था अवसायनात काढल्याने त्याबाबत झालेले मोर्चे , पत्रकबाजी व चालू असलेले राजकारण या सगळ्यांमध्ये जुन्या संस्थांची भूमिका काय आहे हे सर्वांनपुढे मांडणे गरजेचे आहे कारण या सर्वाचा थेट संबंध आमच्याशी आहे. मुळात सहकारी संस्था काढणे व ती टिकवणे हे मोठ्या जिकिरीचं काम आहे. गावात एक संस्था असताना अजून एक निघणे म्हणजे स्पर्धा आली पण त्याच गावामध्ये चार चार नवीन संस्था आल्या तर ती जीवघेणी स्पर्धा ठरते. यात आमच्याच उत्पादकांची दूध पळवली जातात त्यामुळे सगळ्याच दूध संस्था अडचणीत येत आहेत.
अलिकडे फक्त ‘गोकुळची सत्ता आपल्याकडेच रहावी म्हणून नव नवीन बोगस संस्था कागदावर स्थापन करणे सुरू आहे. कागदावरच्या बोगस संस्थांच्या जीवावर धोरण ठरू लागलं तर ते आमच्यासाठी मारक आहे. उद्या संघाचा कोणताही निर्णय आम्हाला मान्य नसला तरी तो या बोगस संस्थेमुळे मान्य केला जाऊ शकेल. त्यामुळे सगळ्या संस्थेची तपासणी करणे आवश्यक आहे . फक्त कागदपत्रे चेक न करता ती संस्था गावात आहे का? खरेच दूध संकलन करते का ? हे दुग्ध निबंधकाने पाहणे आवश्यक आहे. तसेच मागील तीन महिन्याचे सरासरी दूध संकलन न पाहता रोज किती दूध गेले हे तपासावे . तीन महिन्यातून एकदा संस्थेच्या नावावर दूध चढवायचे व संघाकडून तीन महिन्याची सरासरी किती दूध संकलन झाले याचा दाखला घेऊन संस्था अवसायनातून दोष मुक्त करायची ही पद्धत चुकीची आहे.