मी भाग्यवान, शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे पालकत्व लाभले ! दिल्लीपर्यंत झेप घेतली !!
schedule12 Aug 26 person by visibility 116 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन : 'राधानगरीच्या धनगरवाडा या छोट्या वस्तीपासून ते केंद्रीय पोलीस दलात अधिकारी होण्याची झेप ही शहीद परिवाराने पंखांना दिलेल्या बळामुळेच शक्य झाली, 'असे मत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात यूपीएससी मार्फत 252 रँक घेऊन निवड झालेल्या पांडुरंग बाबुराव फोंडे यांनी व्यक्त केले..
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) घेण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) परीक्षेत सहायक सेनानी (असिस्टंट कमांडंट) पदी नुकतीच त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या सन्मानार्थ शहीद शिक्षण प्रसारक मंडळ व परिवारातर्फे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या. जागतिक शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांची विशेष उपस्थित होती. सत्काराला उत्तर देताना फोंडे बोलत होते.धनगरवाडासारख्या छोट्या खेड्यापासून दिल्ली पर्यंत मजल मारणे हा प्रवास सोपा नव्हताच. या प्रवासात शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे पालकत्व मला लाभले यासाठी मी निश्चितच स्वतःला भाग्यवान समजतो. दहावी नंतरचे सर्व शिक्षण आणि किंबहुना आज मी उत्तीर्ण झालेली ही परीक्षा, त्याच्या मुलाखतीच्या क्लास पर्यंत मला शहीद परिवाराने दिलेले आर्थिक आणि मानसिक पाठबळ माझ्यासाठी अत्यंत मोलाचे आहे. या सर्वाचे ऋण मी या जन्मात तरी फेडू शकणार नाही. जन्मदात्या आईसारखी माया देणाऱ्या वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील, वडिलांचे प्रेम आणि मार्गदर्शन देणारे जागतिक शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील , कुटुंबं प्रमुखा प्रमाणे माझ्या सोबत असणारे अनिल पाटील यांच्या सहकार्या शिवाय हे स्वप्न सत्यात उतरलं नसतं.' असे मत फोंडे यांनी व्यक्त केले.
मुलाखतीची तयारी करत असताना डॉ. जगन्नाथ पाटील यांचे आत्मचरित्र असलेल्या चंबुखडी ड्रीम्स या पुस्तकातून प्रेरणा मिळाली. तसेच त्यांची भाषणं आणि मुलाखती इंग्रजी बोलण्यासाठी विशेष उपयुक्त ठरल्या. शहीद परिवारामुळे मला आर्थिक संघर्ष कधीच जाणवला नाही. भविष्यात मी संस्थेसाठी शक्य तितका वेळ देण्याचा प्रयत्न करेन. शहीदच्या नावासोबत माझं नाव जोडलं जाणं हीच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शहीद परिवार सातत्याने होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे, त्यामुळे येथील विद्यार्थिनींनी त्याचा लाभ घ्यावा, शहीद च्या माध्यमातून असे अनेक पांडुरंग घडावेत यासाठी शुभेच्छा देतो. असंही ते पुढे म्हणाले.
धनगरवड्या सारख्या छोट्या खेड्यातील आईवडील एका क्लासवन ऑफिसरचे पालक म्हणून मंचावर उपस्थित राहणं हीच शहीद परिवाराची स्वप्नपूर्ती म्हणावी लागेल असं डॉ. जगन्नाथ पाटील म्हणाले..
पटका, धोतर, नऊवारी, गांधी टोपी असा वेश आजही परिधान करणाऱ्या ग्रामीण आई-वडिलांच्या मुला मुलींची स्वप्न पूर्ण करण्याचे स्वप्न शहीद परिवाराने आज सत्यात उतरवले आहे.
शहीद स्पर्धा परीक्षा केंद्राची सुरुवात आणि पांडुरंग फोंडे अधिकारी होणं हा दुग्धशर्करा योग आहे. आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर कोल्हापरच्या मातीतून अधिकारी घडण्याची प्रथा पांडुरंग ने पुढे नेली. शहीद च्या विद्यार्थिनींनी यातून प्रेरणा घ्यावी. समाज बदलण्यासाठी ग्रामीण भागातून असे अधिकारी घडणे गरजेचे आहे. ग्रामीण भागाचा कोणताही न्यूनगंड न बाळगता अधिकारी होण्याची स्वप्ने बाळगावीत, शहीद परिवार नेहमीच तुमच्या पाठीशी असेल, असे मत जागतिक शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
जे पी फाउंडेशन सुरु करण्यासाठी असलेला उद्देश आज पांडुरंगने पूर्ण केले. सुरुवाती पासूनच 'शहीद' विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले त्याचे यश मिळाले असे मत पांडुरंगचे मार्गदर्शक विजय गायकवाड आणि बिनॉय किनिकर यांनी व्यक्त केले. शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रशांत पालकर यांनी प्रास्ताविक केले. शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्थ अनिल पाटील, कार्याध्यक्ष प्रा. सुनिल पाटील, विजय गायकवाड, बिनॉय किणीकर, पांडुरंग यांचे आईवडील गंगुबाई आणि बाबुराव फोंडे, उपस्थित होते. प्रा. शुभांगी भारमाल यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुनिल पाटील यांनी आभार मानले.