मुंबईतील जसलोक हॉस्पिटलच्या धर्तीवर सीपीआरचा कायापालट- मंत्री हसन मुश्रीफ
schedule13 Jun 25 person by visibility 83 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “उत्तूर येथील शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालयात शिकण्यासाठी आणि या रुग्णालयात उपचारासाठी जगभरातील विद्यार्थी व नागरिक येतील. तसेच या महाविद्यालयातून योग व निसर्गोपचाराचे नामवंत तज्ज्ञ घडतील. तसेच रुग्णांच्या सोयीसाठी मुंबईतील जसलोक हॉस्पिटलच्या धर्तीवर सीपीआरचा कायापालट घडवण्यात येत आहे. येत्या दिवाळीदरम्यान सीपीआरच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होत असून हे काम पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील एकाही गरजू रुग्णाला वैद्यकीय उपचारासाठी मुंबई, पुण्याला जावे लागणार नाही.” असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
राज्यातील पहिल्या शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रथम वर्ष बी.एन.वाय.एस. २०२४ - २५ च्या प्रवेशास प्रारंभ व उद्घाटन समारंभ मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे आयुक्त डॉ. राजीव निवतकर, आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर, नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, उत्तुर येथील शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. भाग्यश्री खोत, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी न. रा. पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाचे मूळ कॉलेज उत्तुरमध्ये आहे. तथापि या महाविद्यालयाची इमारत पूर्ण होईपर्यंत सुरुवातीची दोन वर्षे ते बहिरेवाडी येथील जे.पी. नाईक स्मारकाच्या इमारतीमध्ये भरणार आहे. या महाविद्यालय व रुग्णालयासाठी २०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. पंधरा एकर जागेवर मुख्य रुग्णालय महाविद्यालय आणि प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे.
यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त डॉ. राजीव निवतकर, आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर व डॉ. मिलिंद निकुंभ यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.भाग्यश्री खोत यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालय स्थापनेबाबतची सविस्तर माहिती दिली. विवेक गवळी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, किरण कदम, उत्तुरचे सरपंच किरण अमनगी, बहिरेवाडीच्या सरपंच रत्नजा सावंत, डाॅ. वीणा पाटील, नरसू पाटील, शिवाजीराव देसाई आदी प्रमुख उपस्थित होते.