जोतिबा मंदिर विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सरकार पाठीशी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
schedule05 Jun 25 person by visibility 71 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर विकास आराखड्याची सुरुवात वृक्षारोपणाने होत आहे. हा विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सरकार पूर्णपणे पाठीशी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथे राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून ‘दख्खन केदारण्य’ वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. य कार्यक्रमाला पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ ऑनलाइन तर कार्यक्रमस्थळी खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ.विनय कोरे, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयेन, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग कदम, प्रांताधिकारी समीर शिंगटे उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, वाडी रत्नागिरी डोंगर परिसरातील तीस एकर क्षेत्रामध्ये केदार विजय ग्रंथात नोंद असलेल्या दहा हजार वेगवेगळ्या भारतीय झाडांची लागवड करून दुर्मिळ ‘दख्खन केदारण्य’ साकारत आहे. आमदार डॉ. विनय कोरे यांनी चांगल्या प्रकारे मंदिर व परिसर विकास आराखडा तयार करून घेतला आहे. २५९ कोटी रुपयांच्या कामाला नुकतीच राज्यस्तरीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामध्ये प्रमुख उद्देश हा जोतिबा डोंगर हिरवागार करणे आहे
केंद्रीयमंत्री गडकरी यांनी ‘दख्खन केदारण्य’ सारख्या प्रकल्पांची उभारणी महत्वाची असल्याचे पटवून दिले. स्थानिक आमदार डॉ. विनय कोरे यांनी अनेक वर्षांपासूनचे जोतिबा विकास आराखड्याचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे सांगत या ठिकाणी सर्व वनखात्याच्या जमिनीवर शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्याचा मानस व्यक्त केला. ते म्हणाले चार हजार वर्षांपूर्वीचे वनवैभव पुन्हा या ठिकाणी उभे करू. मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना ग्रामस्थांशिवाय कुठल्याही प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार नाही. प्राधिकरणातही ग्रामस्थांचा सहभाग असेल. मंत्री हसन मुश्रीफ यांनी दख्खन केदारण्य या प्रकल्पास शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यात इतरही ठिकाणी अशाच प्रकारचे उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांचे विविध विकास प्रकल्पांना मंजुरी दिल्याबद्दल आभार मानले. आर्किटेक्ट संतोष रामाने यांनी आराखडा निर्मिती प्रक्रिया व त्याचे महत्त्व उपस्थितांना सविस्तर सांगितले.