बीबीए, बीसीएसाठी पुन्हा प्रवेश परीक्षा होणार- मंत्री चंद्रकांत पाटील यांची अधिकाऱ्यांना सूचना
schedule05 Jun 25 person by visibility 1551 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बीबीए, बीसीए अभ्यासक्रमासाठी पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्याची सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. बीसीए बीबीएच्या प्रवेशप्रक्रियेसंदर्भातील अडचणीबाबत मुंबईत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. चर्चेअंती मंत्री पाटील यांनी, बीसीए बीबीए प्रवेश पूर्ण होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष २५-२६ साठी पुन्हा सीईटी होणार असल्याचे स्पष्ट केले. आता पुनर्परीक्षेमुळे विद्यार्थ्याना बीसीए बीबीएसाठी प्रवेश घेणे सोयीचे होणार आहे.
बीबीए आणि बीसीए पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. या शैक्षणिक वर्षामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी बीबीए बीसीए साठीची प्रवेश परीक्षा न दिल्यामुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मंत्री पाटील यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक झाली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी, प्राचार्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री पाटील यांच्यासमोर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याकरिता सकारात्मक निर्णय घ्यावा अशी आग्रही भूमिका मांडली. या बैठकीसाठी शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे उपाध्यक्ष प्रताप माने, प्राचार्य डी आर मोरे, प्राचार्य व्ही एम पाटील, अॅड. धैर्यशील पाटील, सहभागी झाले.
या बैठकीत परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करता, लवकरात लवकर सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांना योग्य वेळी पुढील वाटचाल करता यावी, या हेतूने तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. वेणूगोपाल बी. रेड्डी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहीतकर आणि उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, कोल्हापूर विभागीय सहसंचालक प्रकाश बच्छाव उपस्थित होते. बीसीए बीबीए अभ्यासक्रमासंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडे संलग्नीकरण शुल्क व अनामत रक्कम कमी करण्यासाठी सरकारच्यावतीने शिफारस करण्यात येईल व त्यासाठी एआयसीटीई चेरअमन यांची संस्थाचालकांच्या शिष्टमंडळासोबत भेट घेणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.