Maharashtra News 1
Register

जाहिरात

 

मुश्रीफ म्हणाले, बापाचा संकल्प पोरांनी पूर्ण करावा ! कागलवर घसरले नाहीत म्हणून केपींचे आभार !!

schedule01 Aug 25 person by visibility 108 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमध्ये दररोज २५ लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प आम्ही केला आहे. गोकुळच्या म्हैस दुधाला मोठया शहरात मागणी आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहेत. शेतकऱ्यांनी त्या योजनाचा लाभ घ्यावा. गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी काम करण्याची मोठी संधी आहे. दूध उत्पादक शेतकरी, संचालक, कर्मचारी या साऱ्यांना सोबतीला घ्यावा. २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण झाला तर तो आनंदाचा दिन असणार आहे. बापाचा संकल्प पोरांनी पूर्ण करावा.’ असे मत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सभासद नोंदणी व पदवीधर मतदार नोंदणी अभियान आढावा बैठक आयोजित केली होती. माजी आमदार के. पी. पाटील, राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने, गोकुळचे संचालक युवराज पाटील किसन चौगले, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, शहराध्यक्ष आदिल फरास, बाजार समिती सभापती सुर्यकांत पाटील,  बिद्री कारखान्याचे व्हाइस चेअरमन मनोज फराकटे, उमेश भोईटे आदींच्या उपस्थितीमध्ये मार्केट यार्डमधील पक्ष कार्यालयात हा कार्यक्रम झाला. मंत्री मुश्रीफ यांचे भाषण सुरू असताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचे आगमन झाले. मंत्री मुश्रीफ यांनी भाषणात व्यासपीठावरील प्रमुख नेते मंडळीची नावे घेतली. त्यानंतर कार्यक्रमासाठी उशिरा दाखल झालेले चेअरमन नविद मुश्रीफ यांचे ही आभार असे म्हणताच उपस्थितामध्ये एकच हंशा पिकला.

याप्रसंगी मंत्री मुश्रीफ यांनी, गोकुळमधील चेअरमन निवडीतील घडामोडी सांगितल्या. शशिकांत पाटील यांचे नाव चेअरमनपदासाठी निश्चित होते. नंतर महायुतीचा चेअरमन व्हावा अशा हालचाली झाल्या. या सगळयात माझा नाईलाज होता याचा पुनरुच्चार मुश्रीफ यांनी केला. गोकुळमध्ये काम करताना आम्ही २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा समोर ठेवला आहे. म्हैस दुधाला मोठी मागणी आहे. म्हैस खरेदीसाठी जिल्हा बँक अर्थसहाय करते, गोकुळ अनुदान देते. दूध उत्पादकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

………..

केपी कागलवर घसलरे नाहीत म्हणून त्यांचे आभार

माजी आमदार के. पी. पाटील यांनी यापूर्वी पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना सगळं काही कागलला अशी मिश्किल टिप्पणी केली होती. तो धागा पकडत मुश्रीफ म्हणाले, ‘आजच्या कार्यक्रमात के. पाटील. हे कागलवर घसरले नाहीत म्हणून त्यांचे आभार मानतो. मी, बँकेच्या चेअरमनपदाचा राजीनामा देतो असे म्हटल्यावर संचालकांनी तो फेटाळला. आमदार विनय कोरे यांनी माझी भेट घेऊन राजीनामा देऊ नका असे सांगितले. बँकेचे संचालक व पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी राजीनामा मागे घ्यावा असा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत मांडला. हे दोघे माझ्या राजीनाम्यासाठी मतभेद विसरले. महायुतीतील मंडळींनी आपले मतभेद असेच विसरुन यापुढे काम करायचे. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसला टक्कर देण्यासाठी महायुती एकत्रित लढली पाहिजे. तर भुदरगड, चंदगड, करवीर अशा ठिकाणी जमतं नाही तिथे वेगळे. मात्र एकमेकांवर टीका करायचं नाही या सुत्रानुसार काम करावं लागणार आहे.’

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes