सक्तीच्या टीईटी परीक्षेतून सवलत मिळण्यासाठी खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार - खासदार धैर्यशील माने
schedule11 Apr 26 person by visibility 29 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘सक्तीची टीईटी परीक्षेतून शिक्षकांना सवलत मिळावी यासाठी माझ्यासह १२५ खासदारांनी हा विषय उचलून धरला आहे. याविषयी मार्ग काढण्यासाठी खासदारांचे शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. २०११ पूर्वीच्या शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्याची गरज नसताना न्यायालयाच्या एका निर्णयाने देशातील शिक्षक वर्ग हवालदिल झाला आहे. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे ’ अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कोल्हापूरतर्फे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला होता. याप्रसंगी खासदार माने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आमदार जयंत आसगाव, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती सभापती शितल यादव, माजी सभापती प्रवीण यादव, शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. कळंबा रोड येथील जय पॅलेस येथे आयोजित कार्यक्रमाला शिक्षकांची संख्या लक्षणीय होती. याप्रसंगी शिक्षक समितीचे पुणे विभागाचे राज्य प्रसिद्धी प्रमुख हरिदास वर्णे यांनी संपादित केलेल्या लढा या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
खासदार माने यांनी भाषणात ‘जोपर्यंत आमदार, खासदार, राष्ट्रपतींची मुले सर्वसामान्यांच्या मुलांबरोबर एकाच शाळेत जातील त्यावेळी भारत बलशाली होईल. ’असे नमूद केले. आमदार आसगावकर म्हणाले,"समाजाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकाचे योगदान मोठे आहे. अशैक्षणिक कामामुळे त्याचे मुख्य शिकवण्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे संच मान्यता टीईटी यासारखे प्रश्न शिक्षकांना भेडसावत आहेत याबाबत सरकारकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच मार्ग काढू.’ शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर म्हणाले, शिक्षकाचे मुख्य काम विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे असून अशैक्षणिक कामामुळे शिक्षकाला पुरेसा वेळ देता येत नाही.’ शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर यांनी प्रास्ताविक केले. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगिता अस्वले यांनी स्वागत केले. याप्रसंगी शिक्षक बँकेच्या अध्यक्षा वर्षा केनवडे, ज्योतीराम पाटील, कृष्णात कारंडे, प्रभाकर कमळकर, अर्जुन पाटील, राजेंद्र पाटील, शिवाजी बोलके, सुरेश कोळी, रामदास झेंडे, बाबुराव परीट, सुनील कुंभार, सुनील शिंदे, शुभांगी माळी, दिलीप चौगले, संतोष पाटील, राजीव परीट, संजय बरगे, सुधाकर सावंत, उमेश देसाई, मारुती पाटील,विनायक मगदूम, सदानंद यादव सुभाष विभुते, राजेश सोनपराते, दादा जांभवडेकर, उपस्थित होते. संजय जितकर बाबा धुमाळ, राजेंद्र तौंदकर यांनी सूत्रसंचालन केले.