अशक्य ते शक्य करतात मुश्रीफ ! रामायणात दहा तोंडाचा रावण, बाजार समितीत अठरा तोंडाची रावणं !!
schedule10 Apr 26 person by visibility 269 categoryराजकीय
सभापती निवडीत उफाळला संचालकांतील अंतर्गत संघर्ष, शुभेच्छा कमी अन् कुरघोडी जास्त
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत, सर्वपक्षीय सत्ता. मात्र संचालकांत, कमालीचे टोकदार मतभेद. मुरब्बी राजकारण्यांना लाजवेल असा अंतर्गत संघर्ष. एकमेकांवर कुरघोडी करायची संधी दवडतील ते संचालक कसले ! शुक्रवारी, नूतन सभापती निवडीदरम्यान संचालकांत चांगलाच कलगीतुरा रंगला. एकमेकांचे वाभाडे काढताना नेते काही संचालकांनी नेते मंडळीवरील रोषही व्यक्त केला. शह - काटशहाच्या या खेळात नूतन सभापती नानासो कांबळे यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम काही वेळेला बाजूला पडतो की काय अशी स्थिती निर्माण झाली. कधी चिमटा, कधी कोपरखळी मारत मनातील शल्य अनेकांनी उघडपणे बोलून दाखविलं. मात्र या साऱ्या धांदलीत आपण समितीच्या कारभाराचा बाजार मांडतोय याचे भानही काहींना नव्हते.
बाजार समितीच्या नूतन सभापती निवडीसाठी शुक्रवारी, ( दहा एप्रिल २०२६) सायंकाळी संचालकांची विशेष सभा आयोजित केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळते सभापती सुर्यकांत पाटील यांना सात महिन्यातच सभापतिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर सभापति निवडीसाठी सभा होती. सभापतिपदासाठी संचालक शेखर देसाई, सुयोग वाडकर, शंकर पाटील, शिवाजी पाटील, जनसुराज्यचे संचालक असे अनेकजण प्रयत्नशील होते. मात्र कोणाच्याही ध्यानीमनी नसताना माजी आमदार संजय घाटगे यांचे समर्थक संचालक नानासो कांबळे ( साके) यांच ी वर्णी लागली. दुपारी, जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक ए. वाय.पाटील व गोकुळचे संचालक युवराज पाटील यांनी बाजार समितीत येऊन सभापतिनिवडी संदर्भात नेत्यांचा निरोप संचालकांना कळविला होता.
सभापतिपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने नानासो कांबळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी प्रिया दळणर यांनी घोषित केले. यानंतर सभापती कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.आणि शुभेच्छापर भाषणाला सुरुवात झाली. संचालक शेखर देसाई यांनी, ‘बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच मागासवर्गीय संचालकांना सभापतिपदी संधी मिळते, नेतेमंडळींनी अतिशय चांगला निर्णय घेतला.’अशा शब्दांत सभापती कांबळे यांचे कौतुक केले. यानंतर संचालक सुयोग वाडकर यांनी, माईक हाती घेतला. त्यांनी, उपस्थित संचालक मंडळावर नजर टाकत, ‘अशक्य ते शक्य करतात मंत्री हसन मुश्रीफ. त्यांनी एका दगडात दोन नव्हे तर पाच -सहा पक्षी मारलेत. सभापतिपदासाठी शेखर देसाई, शंकर पाटील, शिवाजी पाटील यांच्यासह मी ही इच्छुक होतो. आमचं ठरलंय, तुमचं ठरलंय सुरू असताना नानासो कांबळे यांची गाडी पुढे आली. कागलचा सभापती झाला. भविष्यात मलाही संधी मिळेल. आमचे नेते सतेज पाटील हे राज्य पातळीवर चमकणारे नेतृत्व आहे. सध्या आम्ही अल्पमतात आहे, पण ते नक्कीच मला संधी देतील.’अशी टोलेबाजी केली.
‘ आज सभापती निवडीचा कार्यक्रम आहे, यामुळे शुभेच्छापर भाषणे व्हावीत, बाकी काही भाषणबाजी नको’ असा टोलाही वाडकरांनी मावळते सभापती सुर्यकांत पाटील यांच्याकडे पाहत लगावला. यानंतर संचालक नंदकुमार वळंजू यांनी नूतन सभापतींना शुभेच्छा दिल्या. मावळत्या सभापतींच्या काही निर्णयाचे कौतुक केले. ‘आता दादा गेले…नाना आले…त्यांनी सगळया घटकांना सोबत घेऊन कामकाज करावे.’अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान त्यांच्या ‘दादा गेले…नाना आले..’या शब्दांवर मावळते सभापती सुर्यकांत पाटील यांनी, ‘माझा काही विमान अपघात झाला नाही...’असे उत्तर दिले. त्यावर वळंजू यांनी सभापतिपदावरुन दादा गेले असे मला म्हणायचे होते असा खुलासा केला.
सुर्यकांत पाटलांनी घेतले संचालकासह नेते मंडळीवर तोंडसुख
सात महिन्यात सभापतीपदाचा राजीनामा दिलेल्या सुर्यकांत पाटील यांच्या मनातील शल्य बोलून दाखविताना काही संचालकांना फैलावर घेतले. ‘सभापती म्हणून म्हणून कामकाज करताना मी एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला नाही. मात्र काही संचालकांनी मंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन समितीतील रस्ता दुरुस्तीच्या साडेसात कोटीच्या कामात मी साडेतीन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असे कान भरले. दहा संचालक विरोधात असल्याचे सांगितले. रामायणात दहा तोंडाचा रावण होता म्हणतात. पण बाजार समितीत अठरा तोंडाची रावणं आहेत. जिल्ह्यातील काही नेत्यांनीही माझ्याविरोधात मुश्रीफ यांच्याकडे तक्रारी केल्या. मुश्रीफांनी,‘तुला जर संचालक सांभाळता येत नसतील तर तो लोकांना कसा सांभाळणार ? अशी विचारणा केली. वास्तविक त्यांनी, माझ्यावरील आरोपांची शहानिशा करायला हवी होती. माझ्यावरील आरोप सिद्ध करायला हवे होते. मला दोषमुक्त करायला हवे होते. शाहू सांस्कृतिक मंदिराचा कायापालट करुन बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्याचा माझा विचार होता. पण नेत्यांनी सांगितले यामध्ये पडू नका. नेते मंडळीची भूमिका असते की सगळं आम्हाला विचारुन झालं पाहिजे. नेतेमंडळींनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे. मी खोटारडेपणा केला नाही. मी, मुश्रीफ यांना सोडून कुठेही जाणार नाही. त्यांच्यासाठी मी मंडलिक गट, दोन्ही घाटगे गटांशी संघर्ष केला आहे. आता कुठे जाता येत नाही. माझी आणि मुश्रीफांची नाळ एक आहे.’