विश्वप्रभा नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यासाठी तातडीने कारवाई करावी - ठेवीदारांची मागणी
schedule23 Jun 26 person by visibility 120 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : विश्वप्रभा नागरी सहकारी पतसंस्थेतील ८४८१ ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या असून, संस्थेतील आर्थिक अपहारामुळे ठेवीदारांच्या रकमेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.ठेवीदारांच्या माहितीनुसार, संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. राजेंद्र शेटे व त्यांच्या नातलगांचा संस्थेच्या कारभारावर प्रभावी प्रभाव होता. वैयक्तिक व्यवसायाशी संबंधित व्यवहारांसाठी संस्थेचा वापर झाला का, संस्था परवानगीशिवाय ओव्हरड्राफ्ट उघडून त्या खात्यातून व्यवहार झाले का, आणि ते व्यवहार संस्थेच्या पुस्तकामध्ये का दाखविले गेले नाहीत, याची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी ठेवीदार युवराज हेर्लेकर, पतसंस्थेचे संचालक अनिल मगदूम यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
यावेळी बोलताना ठेवीदारांनी संचालकांच्या पत्रव्यवहारानुसार काही कर्मचारी / व्यवस्थापकांनी स्टॅप पेपरवर आर्थिक अपहारासंबंधी कबुलीजबाब दिल्याचा उल्लेख आहे. तरीदेखील संबंधित व्यक्तींना संस्थेच्या कामकाजापासून तातडीने दूर करून रेकॉर्डस सुरक्षित ठेवण्याऐवजी त्यांच्याकडून काम करून घेतल्याची गंभीर तक्रार ठेवीदारांमध्ये आहे.
संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षक यांनी २०२३-२०२४ व २०२४-२५च्या ऑडिट मध्ये रू. ७.९८ कोटींचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. ठेवीदारांनी लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशन, सहकार आयुक्त, सहकार सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक, कोल्हापूर शहर उपनिबंधक यांचेकडे यासंदर्भात दाद मागितील आहे. मात्र, सहकार विभागाकडून एफआयआर बाबत स्पष्ट निर्देश, जबाबदार व्यक्तींवर तातडीची कारवाई, मालमत्ता जप्ती किंवा ठेवीदारांचे पैसे सुरक्षित करण्यासाठी परिणामकारक पावले उचलण्यात विलंब होत आहे.
ठेवीदारांमध्ये अनेक शेतकरी, वयोवृद्ध, निवृत्तीवेतनधारक, आजारी व मध्यमवर्गीय कुटुंबातील नागरिक आहेत. काही ठेवीदारांच्या कुटुंबात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यामुळे ठेवीदारांचे हित लक्षात घेऊन शासनाने या प्रकरणात विलंब न करता कारवाई करणे अत्यावश्यक आहे. आणि ठेवीदारांचे पैसे मिळणे आवश्यक आहे.
ठेवीदारांनी शासन, सहकार विभाग, जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, पोलीस विभाग यांनी संयुक्तरीत्या तातडीने कारवाई करावी, अन्यथा ठेवीदारांना लोकशाही मार्गाने पुढील आंदोलनाचा विचार करावा लागेल, असा इशारा दिला आहे.यावेळी दिनानाथ माणगांवे, संभाजी पाटील, विवेक भुर्के, डॉ. बाळासो पाटील, कल्पना पाटील, युवराज हेर्लेकर, विनय वदडी, सुलोचना वदडी, समर्थ वदडी, धोंडिराम सिद आदी ठेवीदार उपस्थित होते.