अभियांत्रिकी प्रवेशाच्या शंकांना मिळणार पूर्णविराम; केआयटीतर्फे रविवारी मोफत मार्गदर्शन कार्यक्रम
schedule05 Jun 26 person by visibility 73 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बारावीनंतर अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडविण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना प्रवेश प्रक्रियेची अचूक, अद्ययावत व सर्वांगीण माहिती उपलब्ध करून देण्यासाठी केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्यावतीने रविवारी ( ७ जून २०२६ ), ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या संधी व प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया-२०२६’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव दीपक चौगुले, विश्वस्त सुनील कुलकर्णी व संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यानी पत्रकार परिषदेत दिली.
विशेष मार्गदर्शनाचा हा कार्यक्रम सायबर कॉलेज येथील आनंद भवन सभागृह येथे सकाळी दहा वाजता आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. संचालक वनरोट्टी म्हणाले, ‘या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ प्रवेश प्रक्रियेची माहितीच नव्हे, तर भविष्यातील करिअरच्या दृष्टीने योग्य शाखा निवडण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता , डेटा सायन्स, मशीन लर्निंग, सायबर सुरक्षा, रोबोटिक्स, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर, इंटरनेट ऑफ थिंग्जसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या करिअर आणि रोजगाराच्या संधींबाबत सखोल माहिती दिली जाणार आहे.’
कार्यक्रमात प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया-२०२६ मधील प्रत्येक टप्प्याचे सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन नोंदणी, कागदपत्र पडताळणी, प्राधान्यक्रम निवड, केंद्रीकृत प्रवेश फेरी, जागावाटप प्रक्रिया, प्रवेश निश्चिती आणि आवश्यक कागदपत्रे यांची सखोल माहिती दिली जाणार आहे. याशिवाय विविध शिष्यवृत्ती योजना, शासकीय आर्थिक सवलती, आरक्षण धोरण, ईबीसी व इतर शुल्क सवलती, तसेच विद्यार्थिनींसाठी उपलब्ध विशेष शासकीय लाभ याविषयीही तज्ज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता व प्रवेश प्रक्रिया प्रमुख डॉ. महेश शिंदे यांनी सांगितले की, “अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनात अनेक प्रश्न, शंका आणि संभ्रम असतात. या पार्श्वभूमीवर प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक बाब स्पष्ट करून विद्यार्थ्यांना योग्य शाखा, योग्य महाविद्यालय आणि योग्य करिअर निवडण्यासाठी सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.” पत्रकार परिषदेवेळी प्रा. अमित वैद्य, प्रा. अमर टिकोळे उपस्थित होते.