आठवणीतीले दवबिंदू कवितासंग्रहातून आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची मानसिकता लाभते– प्राचार्य जी.पी.माळी
schedule02 Jun 26 person by visibility 58 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांच्या ‘आठवणीतीले दवबिंदू’ या कवितासंग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे, आयुष्यात जे अनुभवलं तेच कागदावर उतरविलं. त्यांच्या कविता मानवी नातेसंबंधावर भाष्य करतात. तसेच निसर्गाशी जोडलेल्या व मातीशी जुळलेल्या आहेत. कवितासंग्रहातून विद्यार्थ्याविषयी जिव्हाळा, कुटुंबांविषयी कळवळा, निसर्गाविषयी प्रेम आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची मानसिकता प्रकट होते.’असे मत प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांनी व्यक्त केले.
कमला कॉलेजमधील सेवानिवृत्त प्राचार्य जे. बी. पाटील यांच्या ‘आठवणीतीले दवबिंदू’या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ मंगळवारी, (दोन जून २०२६) आयोजित केला होता. शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा विभाग व मूल्यमापन मंडळाचे माजी संचालक डॉ. बी. एम. हिर्डेकर प्रमुख पाहुणे होते. नारायण मरणहोळकर, प्रा. शिवराम जाधव, सौ. श्रीमंता पाटील, डॉ. सुनील ज. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला.
डॉ. माळी म्हणाले, ‘प्राचार्य डॉ जे. बी. पाटील व माझ्यामध्ये काही गोष्टींचे साम्य आहे. ते चंदगड या सीमभागातील आहेत. तर मी जतसारख्या सीमाभागातील आहे. त्यांच्या आणि माझ्या नोकरीची सुरुवात ज्योती कॉलेजमधून झाली. पुढे दोघांची कर्मभूमी ही कोल्हापूर बनली. संघर्षशील जीवन राहिले.या कवितासंग्रहाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्याचे दर्शन घडते. कवितासंग्रहात एकूण ५० कविता आहेत. ते इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. प्राचार्य म्हणून उत्तम काम केले आहे. हा कवितासंग्रह वाचताना त्यांचे मराठीवरील प्रभुत्व दिसते. शब्दांनी लेखणीला बळ द्यावे आणि मोहरलेल्या कवितेकडून रसाळ फळ मिळावे. या भूमिकेतून साकारलेला हा कवितासंग्रह वेगळी अनुभूती देतो.’
डॉ. हिर्डेकर म्हणाले, ‘’ प्राचार्य पाटील यांच्या कवितासंग्रहात निसर्गातील विविध रंगाच्या छटा उमटल्या आहेत. निसर्गाची विविध रुप शब्दबद्ध करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हलाखीचे जे चित्रण केले आहे ते अस्वस्थ करणारे आहे. समाजातील जातीय तेढवर भाष्य करणाऱ्या कविता अंतर्मुख बनवितात. महत्वाचं म्हणजे, गावपांढरविषयी कृतज्ञतेचा भाव उमटला आहे.’ प्राचार्य जे. बी. पाटील यांनी कविता लेखनामागील भूमिका उलघडली. गेल्या पस्तीस वर्षातील चिंतन, वैयक्तिक व सामाजिक पातळीवरील भलेबुरे अनुभव शब्दांत मांडले आहे.असे त्यांनी सांगितले. डॉ. स्फूर्ती सुनील पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. सुजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. साधना पाटील यांनी आभार मानले.