भाजपाचा वर्धापनदिन, सिनीअर कार्यकर्त्यांचा सन्मान अन् २०२९ च्या निवडणुकीसाठी तयारीचे आवाहन
schedule06 Apr 26 person by visibility 63 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ जनसंघापासून राजकीय, सामाजिक वाटचाल केलेल्या भारतीय जनता पक्षाची स्थापना ६ एप्रिल १९८० मध्ये झाली. आज् या पक्षाचा ४६ वा वर्धापनदिन... या निमित्तान पक्षाच्यावतीनं सक्रिय कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन केले होते. मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा वर्धापनदिन समारंभ पक्ष कार्यालयात पार पडला.
वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या वाटचालीत योगदान दिलेल्या राजाराम शिपुगडे, दिलीप मैत्राणी, मामा कोळवणकर, किशोरी स्वामी, प्रभावती इनामदार, अॅड. संपतराव पवार, भारती जोशी, प्रमोदिनी हर्डीकर, अशोक लोहार, ईश्वरा पाटील, सुलभा मुजुमदार, राजाराम परिट यांचा सत्कार करण्यात आला.
मंत्री पाटील म्हणाले, ‘२०४७ पर्यंत भारताला जगातील प्रथम क्रमांकाचा देश बनवण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यांचा हा निर्धार यशस्वी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच पक्ष कार्याला वाहून घ्यावं. देशात २०२९ पर्यंत आता कोणत्याही निवडणूका नाहीत. त्यामुळं भविष्यातील निवडणूका जिंकणं महत्वाचं आहे. त्यासाठी मतदार याद्या अद्ययावत करणे, पक्ष संघटन बळकट करून, केंद्र आणि राज्यांच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोचवा.’ खासदार महाडिक म्हणाले, ‘संसदेत प्रारंभी २ खासदारांच्या संख्याबळामुळं टिकेचा धनी बनलेला भारतीय जनता पक्ष आता महाराष्ट्रासह २१ राज्यात सत्तास्थानी आहे. यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. २०२७ पासून देशातील लोकसभा - विधानसभा मतदार संघांची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
याप्रसंगी महापौर रुपाराणी निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महापालिकेतील गटनेते मुरलीधर जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी प्रास्ताविक केले. विराज चिखलीकर यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी आभार मानले.