कामगार- कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सरकारच्या चार श्रमसंहितेला जोरदार विरोध
schedule13 Feb 26 person by visibility 29 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कामगार विरोधी धोरण राबविणाऱ्यांचा धिक्कार असो, लाल बावटे की जय, चार श्रमसंहिता रद्द करा- नाही तर खुर्ची खाली करा’अशा घोषणा देत कामगार व कर्मचारी संघटनेतर्फे गुरुवारी, (१२ फेब्रुवारी २०२६) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिले.
केंद्र सरकारने आणलेल्या चार श्रमसंहिता रद्द कराव्यात. आणि पूर्वीचे २९ कामगार कायदे लागू करावेत या प्रमुख मागण्यासाठी गुरुवारी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. कोल्हापुरातही विविध कामगार व कर्मचारी संघटना एकत्र येत आंदोलन केले. या आंदोलनात बाराहून अधिक कामगार व कर्मचारी संघटनांचा सहभाग होता. लाल झेंडे हाती घेत व हमारी माँगे पुरी करो अशा घोषणा देत कामगार व कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. याप्रसंगी कामगार व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर ठिय्या मारला. कॉम्रेड चंद्रकांत यादव, अतुल दिघे, रघुनाथ कांबळे, संजय गावडे, सुवर्णा तळेकर यांनी मार्गदर्शन केले. ‘केंद्र सरकारची धोरणे ही कामगार विरोधी आहेत. त्यांच्या न्याय हक्कावर गदा आणणाऱ्या आहेत. सरकारने चार श्रमसंहिता रद्द कराव्यात, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू.’असा इशारा दिला.
मोर्चातील ‘सर्वांना वेतन, सर्वांना पेन्शन - सर्वांना ग्रॅच्युइटी सर्वांना समान’असा मजकूर लिहिलेले फलक लक्षवेधी ठरले. आंदोलनात कॉम्रेड दिलीप पवार,, अनंत कुलकर्णी, शिवाजी मगदूम, आबासाहेब चौगुले, बन्सी सातपुते, सतीश सर्वगौड, भगवान पाटील, सुधाकर पिसे, मारुती कांबळे, प्रकाश जाधव, एन. एस. मिरजकर, नयना सावंत, हिराबाई कांबळे, सुधाकर सावंत आदी उपस्थित होते.