चुकीच्या शैक्षणिक धोरणाविरोधात हजारो शिक्षकांचा हल्लाबोल, सरकार- प्रशासनाविरोधात उमटला रोष
schedule09 Jul 26 person by visibility 507 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सेवाज्येष्ठता डावलून दिलेल्या पदोन्नत्या , अन्यायी संचमान्यतेचा निर्णय, वीस पटाखालील शाळा बंद पाडण्याचा डाव, टीईटीची सक्ती, अशैक्षणिक कामांचा भडीमार अशा विविध विषयावरुन सरकारच्या विरोधात शिक्षकांनी एल्गार पुकारला. कोल्हापुरात गुरुवारी, हजारो शिक्षक रस्त्यावर उतरुन जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला. ‘विद्यार्थ्याना शिकू द्या, शिक्षकांना शिकवू द्या’अशा शब्दांत ठणकावले. सरकार आणि प्रशासकीय पातळीवर शिक्षकांच्या मागण्यासंबंधी सकारात्मक निर्णय झाला नाही तर, बेमुदत शाळा बंद आंदोलन पुकारले जाईल असा इशारा दिला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि विविध शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धडक मोर्चाद्वारे शिक्षकांनी शक्तीप्रदर्शन घडविले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दसरा चौक येथून मोर्चाला प्रारंभ झाला. ‘सेवाज्येष्ठतेचा मान, पदोन्नतीचा सन्मान, टीईटी सक्ती रद्द करावी, मनपा शिक्षकांना शंभर टक्के वेतन मिळाले पाहिजे, अशैक्षणिक कामे बंद करा – शिक्षणाला न्याय द्या, न्याय द्या – न्याय द्या शिक्षकांना न्याय द्या, मुलांना शिकू द्या, शिक्षकांना शिकवू द्या, शिक्षकांचा सन्मान राष्ट्राचा अभिमान, टीईटीचा पुनर्विचार शिक्षकांचा अधिकार, शिक्षण सेवक योजना बंद करुन पूर्ण वेतनावर शिक्षक नियुक्त करा, आमचा निर्धार गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार’ या मजकुराचे फलक हाती घेऊन हजारो शिक्षक आंदोलनात उतरले.‘’हम सब एक है, शिक्षणाचे वाटोळं करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, गोरगरीबांचे शिक्षण संपवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शिक्षकांचा अवमान करणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांचा निषेध असो’ अशा घोषणा देत मोर्चा मार्गस्थ झाला. प्राथमिक, माध्यमिक, ज्युनिअर कॉलेजसह महापालिका आणि नगरपालिका शाळेतील शिक्षकांचा आंदोलनात सहभाग राहिला.
दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, बसंत- बहार रोड मार्ग मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. या ठिकाणी निदर्शने झाली. यानंतर मोर्चा जिल्हा परिषदेवर काढण्यात आला. जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावर शिक्षकांनी सभा घेतली. या सभेत शिक्षक नेत्यांनी सरकार आणि प्रशासनाच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणाविरोधात टीकेची झोड उठविली. शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पोवार, सचिव आर. वाय. पाटील, आर. वाय. मोरे. के. एस. पाटील, शिक्षक नेते राजाराम वरुटे, संभाजी बापट, प्रसाद पाटील, भरत रसाळे, दादासाहेब लाड, बाबा पाटील, सुधाकर सावंत, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष बी. जी. बोराडे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर, शिक्षक बँकेचे संचालक अर्जनु पाटील, बाळासाहेब निंबाळकर, राजेंद्र पाटील, गजानन कांबळे, सुनील एडके, गौतम वर्धन, अमर वरुटे, वर्षा केनवडे, बँकेचे माजी अध्यक्ष राजमोहन पाटील, प्रशांत पोतदार, बाजीराव कांबळे, बबन केकरे, श्रीकांत चव्हाण, मारुती दिंडे, श्वेता खांडेकर, कोजिमाशिचे दत्तात्रय घुगरे, राजेंद्र रानमाळे, राजेंद्र पाटील, सी. एम. गायकवाड, राजेंद्र कोरे, उदय पाटील, राजेश वरक, संतोष आयरे, विलास पोवार, मुख्याध्यापक राजाराम संकपाळ, संजय सौदलगे, सविता पाटील, वृषाली कुलकर्णी, रणधीर मिरजकर, अजित अलासकर, विलास परीट, विलास पिंगळे, संतोष आयरे, प्रा. एच. आर. देसाई, बी.एस. खामकर, बाळासाहेब चिंदगे, संजय चोरमारे, जयसिंग देवकर,कृष्णात कारंडे, तानाजी मेढे, संदीप मगदूम, उमेश देसाई, दिलीप माने, सतीश बरगे, अण्णासाहेब बागडी, बी. एस. पाटील, विजय मेटकरी, संग्राम पाटील, पी. बी. रक्ताडे, डी. एन. जाधव, वनिता कोरी, मंगल माने, अनिता उत्तरे, विना कापसे, प्रिया देसाई, करणसिंह सरनोबत, सतीश लोहार, राजू किरुळकर यांच्यासह हजारो शिक्षक व शिक्षिका सहभागी झाल्या.
…………………………………………..