मार्केट सेस चालूच राहणार, कोल्हापूर बाजार समितीचे राष्ट्रीय बाजार समितीत वर्गीकरण नाही - मंत्री जयकुमार रावळ
schedule23 Aug 26 person by visibility 43 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘नागपूर आणि मुंबई बाजार समितीचे राष्ट्रीय बाजार समितीमध्ये रूपांतर केले, पुणे बाजार समितीची उलाढाल मोठी असून पुढील काळात पुणे सुद्धा राष्ट्रीय बाजार समितीमध्ये होऊ शकते. मात्र कोल्हापूरसह राज्यातील इतर बाजार समिती यांचा राष्ट्रीय बाजार समितीमध्ये वर्गीकरण होणार नाही. बाजार समित्या महत्त्वाच्या आहेत. सेस बंद केला तर बाजार समित्या चालणार नाही. त्यामुळे सध्या तरी बाजार समितीचे सेस वसुली बंद करता येणार नाही’अशी ग्वाही पणनमंत्री जयकुमार रावळ यांनी दिली.
मंत्री रावळ हे रविवारी, २३ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी, कोल्हापूर बाजार समितीला त्यांनी भेट दिली. याप्रसंगी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिनधीशी बोलताना रावळ म्हणाले, ‘राज्यातील बाजार समितीचे बळकटीकरणसाठी आशियाई बँकेकडून ५०० कोटी रुपयांचे कर्ज प्रस्तावित आहे. त्याबाबतचा प्रस्ताव अंतिम आहे. बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता आणि नोकर भरतीचे निकष तयार करून स्वतंत्र यंत्रणेमार्फत बाजार समित्यांमध्ये नोकर भरती करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नाना कांबळे यांच्यासह अन्य संचालकांनी मंत्री रावळ यांचे स्वागत केले. अन्न व औषध प्रशासन विभागातील वरिस्ठ अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कारवाईनंतर गूळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीच वातावरण आहे त्यामुळे गुळ कसा तयार करायचा त्यामध्ये कोणत्या घटकाचा प्रमाण किती असावा या संबंधित गुळ उत्पादकांना मार्गदर्शन करण्याची गरज असल्याो संचालक सुयोग वाडकर यांनी सांगितले. संचालक प्रकाश देसाई यांनी, ‘कोल्हापुरी गुळाचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश करावा आणि गुळाची प्रतवारी तपासण्यासाठी प्रयोगशाळा उभारावी’अशी मागणी केली. संचालक नंदकुमार वळंजू यांनी,‘बाजार समितीला कर्जरुपाने आठ कोटी रुपये देण्यापेक्षा सरकारने थेट अनुदान द्यावा अशी मागणी केली. सभापती कांबळे, संचालक कुमार अहुजा सचिव तानाजी दळवी यांनी या चर्चेत भाग घेतला.