वीज कामगारांचे हाल करण्यासाठी मेस्माची चाल सरकारने वापरली का? कामगार संघटनेचा सवाल
schedule26 Aug 26 person by visibility 44 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : वीज उद्योगात सुमारे ४२ हजार कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. मात्र त्यांचे टेंडर वेळेवर न होणे, एजन्सी कडून वेळेवर वेतन न देणे, बोनस व वेतन वाढीचा फरक न देणे,दरमहा वेतनातून काही रक्कम ठेवून घेणे अथवा हस्तका मार्फत काढून घेणे, राष्ट्रीय कृत बँकेत वेतन न होणे, याला विरोध करणाऱ्यां कामगारांना जाणीवपूर्वक कमी करणे, दूर अंतरावर बदली करणे,असे प्रकार अनेक कंत्राटदारांमार्फत चालू आहेत त्यातच स्मार्ट व क्रिस्टल या कंपनीने अचानक पगार कमी केले या व विविध समस्या बाबत कामगार वर्गात नाराजीचा सूर असल्याने ऐन पावसाळ्यात काम बंद आंदोलनाची नोटीस संघटनेने उर्जामंत्री व वीज कंपनीला दिली होती. या पार्श्वभूमीवर वीज कंत्राटी कामगार संघाचे सचिव अभिजित माहुलकर यांनी फडणवीस यांची नागपुरात भेट घेऊन ऊर्जा खात्यातील वीज कंत्राटीची कहाणी सांगीतली. बैठक लावतो असे आश्वासन त्यांना मिळाले. मात्र सरकारने अचानक चौदा ऑगस्टपासून मेस्मा लागू केल्याने कामगार हवालदिल झाले आहे. त्यामुळे वीज कामगारांचे हाल करण्यासाठी मेस्माची चाल सरकारने वापरली का? असा सवाल कामगार करत आहेत. सरकार दिलेला शब्द पाळत नाही व मेस्मा लावून कामगार वर्गाची मुस्कट दाबी करत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांनी व्यक्त केले.