प्राचार्य मधुकर बाचुळकर यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन
schedule19 Apr 26 person by visibility 91 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : वनस्पतीतज्ञ व पर्यावरण अभ्यासक प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर यांचा संघर्षमय आणि कार्यकर्तुत्वपर जीवनपट "निसर्गदूत - प्राचार्य डॉ.मधुकर बाचूळकर --चोळेकर" या पुस्तकात मांडला आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 22 एप्रिल 2026 रोजी होणार आहे.
एक पर्यावरणप्रेमी प्राध्यापक, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काय काय करू शकतो ,याचा प्रत्यक्ष प्रत्यय देणारे हे पुस्तक आहे. वनौषधींचं संरक्षण -संवर्धन करण्यापासून ,सातारा येथील कास पठाराला "जागतिक वारसा " मिळवून देण्यापर्यंत त्यांचं योगदान आहेच. परंतु "इंडाल" सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या विरोधात जाऊन, खाणकामा विरुद्ध लढा देऊन, कंपनीस देशातून हद्दपार करणारा, नव महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पास, शक्तिपीठ महामार्गास विरोध करुन, जैवविविधता, पर्यावरणासाठी पाय रोवून यशस्वी लढे देणारा हा ज्ञानोपासक, जनजागृती बरोबरच अनेक विधायक, सकारात्मक आणि संशोधनात्मक कार्यांमध्ये कसं यशस्वी योगदान देऊ शकतो ,तसेच कसा विद्यार्थीप्रिय, आदर्श-गुणवंत शिक्षक आणि कडक शिस्तीचा प्राचार्यही बनू शकतो, याचं प्रत्यंतर हे पुस्तक वाचताना येते. पश्चिम घाट, जैव विविधता संवर्धनासाठी आणि पर्यावरण विषयक दिलेल्या लढ्यासह सर्वच स्तरावर दिलेल्या योगदानाचा लेखक डॉ.मधुकर येवलुजे यांनी शब्दांकन केले आहे.
पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी सायंकाळी 5.30 वाजता जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून, शहाजी लॉ कॉलेज, (के.डी.सी सी.बॅंकेच्या शेजारी ) शाहूपुरी,कोल्हापूर येथे होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून वन्यजीव विभागाचे माजी अतिरिक्त प्रधान सुनील लिमये यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. पर्यावरण तज्ञ प्रा. डॉ .जय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, पेठ वडगाव येथील श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव पोळ, वनस्पतीतज्ञ .डॉ. एस. आर. यादव, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही.एन शिंदे, कौन्सिल ऑफ एज्युकेशन सोसायटीचे डॉ. विश्वनाथ मगदूम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. यावेळी अमोल बुचडे यांचा पर्यावरणावर आधारित सुरेल गीत गायनाचा कार्यक्रम होणार. अशी माहिती डॉ.मधुकर यवलुजे, राहुल मगदूम, सुहास वायगंणकर, परितोष उरकुडे, डॉ. विदुला स्वामी, डॉ. मकरंद ऐतवडे, अभिजीत जाधव, जयश्री गंगाधरे, सुनील मुळे आदींनी दिले आहे.