अभियंत्यांच्या योगदानातून साकारेल आत्मनिर्भर भारत – मेजर अभिजीत ताम्हणकर
schedule17 Aug 26 person by visibility 49 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पात अभियंत्यांची भूमिका निर्णायक आहे. आजही अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी भारताला परदेशांवर अवलंबून राहावे लागते. हे परावलंबित्व दूर करून स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याची आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्याची जबाबदारी अभियंत्यांनी स्वीकारली पाहिजे,” असे प्रतिपादन भारतीय सैन्यातील अधिकारी तथा केआयटी अभियंत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मेजर अभिजीत ताम्हणकर यांनी केले.
कोल्हापूर येथील केआयटी अभियंत्रिकी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मेजर ताम्हणकर उपस्थित होते. महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटतर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सचिन मेनन यांच्या हस्ते मेजर ताम्हणकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, त्यांच्या जडणघडणीत आणि देशसेवेच्या प्रवासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांचा संस्थेचे सचिव दीपक चौगुले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना मेजर ताम्हणकर यांनी केआयटीशी असलेले ऋणानुबंध आवर्जून व्यक्त केले. “आज मी जे काही आहे, त्यामागे केआयटीने दिलेले शिक्षण, संस्कार, शिस्त आणि मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे,” असे सांगत त्यांनी महाविद्यालयाच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले. आपल्या माजी विद्यार्थ्याला देशसेवेच्या सर्वोच्च जबाबदारीपर्यंत पोहोचताना पाहणे ही संस्थेसाठी अभिमानाची बाब असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मेजर ताम्हणकर यांनी ज्ञान, कौशल्य, संशोधन आणि शिस्त यांचा प्रभावी संगम साधण्याचे आवाहन केले. “विकसित भारताचे स्वप्न केवळ घोषणांनी पूर्ण होणार नाही; त्यासाठी प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात प्रत्यक्ष योगदान दिले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले. संरक्षण क्षेत्रासह देशाच्या गरजेच्या विविध क्षेत्रांत स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून परावलंबित्वाची साखळी तोडण्यासाठी अभियंत्यांनी नावीन्यपूर्ण संशोधनाला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले. “ महाविद्यालयीन जीवनात संयम, ज्ञान आणि शिस्त या तीन मूल्यांना केंद्रस्थानी ठेवा. आज मिळणाऱ्या संधींचा योग्य उपयोग करून उद्याच्या भारतासाठी स्वतःला सक्षम करा,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी सामाजिक जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. तसेच शौर्य व एनसीसीच्या माध्यमातून मेजर ताम्हणकर यांचा विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद आयोजित करण्यात आला. महाविद्यालयीन जीवनापासून भारतीय सैन्यातील अधिकारी पदापर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास, आव्हाने आणि अनुभव या संवादातून विद्यार्थ्यांसमोर उलगडला.कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त सुनील कुलकर्णी, भरत पाटील व दिलीप जोशी, संचालक डॉ. मोहन वनरोट्टी, रजिस्ट्रार डॉ. दत्तात्रय साठे उपस्थित होते.