दोन वर्षातील कामासाठी सात वर्षे विलंब कशासाठी ? राजेश क्षीरसागरांनी अधिकाऱ्यासह ठेकेदारांना खडसावले
schedule21 Apr 26 person by visibility 55 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : अमृत एक योजनेतून शहरातील पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनचे काम सुरु आहे. कामाच्या निविदेप्रमाणे काम सुरु केल्यानंतर दोन वर्षात काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, गेली सात वर्षे हे काम सुरूच आहे. या कामास इतका विलंब का? असा सवाल करीत आमदार क्षीरसागर यांनी केला.
उमा टॉकीज, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, नागाळा पार्क परिसरातील अपुऱ्या व दुषित पाणीपुरवठ्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी पाणी पुरवठ्याबाबतच्या असंख्य तक्रारींचा पाढाच वाचून दाखविला. शहरातील अपुऱ्या व दुषित पाणी पुरवठ्याबाबत आमदार क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत अधिकारी आणि ठेकेदारांच्या कामाचा नागरिकांसमोरच सोक्षमोक्ष लावला. ‘ठेकेदार काम करण्यास टाळाटाळ करत असेल तर त्याला ब्लॅक लिस्ट करून फौजदारी गुन्हा दाखल करावा. प्रसंगी ठेकेदार बदलून ही कामे अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून पूर्ण करून घ्यावीत. मे २०२६ च्या अखेरपर्यंत अमृत १ योजनेतील प्रलंबित सर्व कामे पूर्ण करा, अन्यथा ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करा,’अशा सूचना त्यांनी केल्या.
शहरवासियांना मुलभूत सोयी सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि मुलभूत सोयीसुविधा विना अडथळे, विनाविलंब पुरविणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. परंतु, ठेकेदारांचा निष्काळजीपणा आणि अधिकाऱ्यांचे होणारे दुर्लक्ष यामुळे नागरिकांना हक्काच्या सोयी सुविधांमध्ये अभाव दिसून येत आहे. नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका. शहरवासीयांच्या मुलभूत सोयी सुविधेत होणारा विलंब खपवून घेणार नाही.अपुऱ्या पाणी पुरवठ्याची कारणे शोधून त्याचा अहवाल सादर करा. ज्या ठिकाणी नव्याने पाईपलाईन टाकाव्या लागणार आहेत त्या सर्व ठिकाणचा आराखडा तयार करून त्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा, अशा सूचना दिल्या. यावेळी नगरसेविका निलिमा पाटील, माजी नगरसेवक अजित मोरे, शैलेश पाटील, महापालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जलअभियंता हर्षजीत घाटगे, अभियंता मयुरी पटवेगार, अमोल मिंचे, धवल पाटील, अजय मोहिते, भरत पाटील, विकास घागरे, सचिन पवार, रंजना शिर्के उपस्थित होत्या.