राष्ट्रवादीची वेळ चुकली, शिवसेनेचा परिवहन सभापतीवर निशाणा
schedule06 Mar 26 person by visibility 143 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेतील समिती सभापतीवरुन महायुतीमध्ये सुरू असलेली धुसफूस अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत पाहावयास मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला परिवहन समिती सभापतिपद देण्याचे ठरले, मात्र त्यांना वेळेत निरोप मिळाला नाही. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते मुदतीत महापालिकेत पोहोचू शकले नाहीत. यामुळे शिवसेनेकडून नगरसेवक सत्यजित जाधव यांचा उमेदवारी अर्ज परिवहन समिती सभापतीपदासाठी दाखल करण्यात आला. यावरुन राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विशाल शिराळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी भाजपच्या कौसर बागवान व उपसभापतिपदासाठी दीपा अजित ठाणेकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. काँग्रेसनेही समिती सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढविण्याचे इरादे स्पष्ट केले. महापालिकेच्या विविध समिती सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत, शुक्रवारी (सहा मार्च २०२६) दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत होती. महायुतीमध्ये समिती सभापतिपदासाठी फॉर्म्युला ठरला आहे. त्या फॉर्म्युलानुसार स्थायी समिती सभापतिपदासाठी नगरसेवक शिराळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर काँग्रेसकडून नगरसेवक अमर समर्थ यांचा अर्ज आहे.
परिवहन समिती सभापतिवरुन गेले काही दिवस शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू होती. सभापतिपद कोणाला हा पेच न सुटल्याने वरिष्ठापर्यंत हा विषय गेला. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी परिवहन समिती सभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेसला द्यायचे ठरले. राष्ट्रवादीकडून नगरसेविका मानसी लोळगे यांचे नाव निश्चित होते. मात्र राष्ट्रवादीला यासंदर्भात वेळेत माहिती दिली नाही. यामुळे सायंकाळी पाच वाजत आले तरी राष्ट्रवादीचे नगरसेवक महापालिकेत दाखल झाले नाहीत. पाच वाजण्यास दोन मिनिटाचा अवधी असताना शिवसेनेकडून नगरसेवक सत्यजीत चंद्रकांत जाधव यांनी परिवहन समिती सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर दहा मिनिटाच्या कालावधीत राष्ट्रवादीचे नगरसेवक महापालिकेत पोहोचले. राष्ट्रवादीचे गटनेते फरास यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे वेळेत का कळविले नाही अशी विचारणा केली. भाजपवर आमचा राग नाही, पण कोणी आम्हाला गृहित धरत असेल तर योग्य नाही अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.