संजय घोडावत विद्यापीठाच्या प्रांगणात उलगडली नाना पाटेकरची मुलूखगिरी ! सिनेमा, नाटकासह सामाजिक कार्यावर प्रकाशझोत !!
schedule18 Dec 25 person by visibility 64 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘मरणावर विश्वास ठेवला की जगणं सुंदर होते. आत्मपरीक्षण केल्यास जीवनाला दिशा मिळते, आपली ओळख भारतीय म्हणून अभिमानाने जपा. देश समृद्ध करण्यासाठी मनापासून काम करा. देशविरोधी विचारांना ठामपणे विरोध करा, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहा, आणि स्वतःवर प्रेम करा, ’ असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.
संजय घोडावत विद्यापीठाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी ‘दिलखुलास विथ नाना पाटेकर’ हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची सुरुवात पाटेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विजयचंद घोडावत, राजेश घोडावत, राकेश घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, रजिस्ट्रार डॉ. विवेक कायंदे, इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका मोहंती यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्रशांत कुलकर्णी आणि पंकज मेहता यांच्या ‘शब्द पंख’ प्रकाशनाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी विश्वनाथ पाटेकर ते नटसम्राट नाना पाटेकर असा प्रेरणादायी परिचय करून दिला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नाना पाटेकर यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडले. नाटक, सिनेमा, सामाजिक कार्य अशी मुलुखगिरी अनुभवता आली.
चेअरमन संजय घोडावत यांनी नाना पाटेकर यांच्या अभिनय कारकिर्दीबरोबरच ‘नाम फाउंडेशन’ च्या माध्यमातून केलेल्या समाजसेवेचा गौरव केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका घेत नाम फाउंडेशन बरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संजय घोडावत विद्यापीठ आवश्यक सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पाटेकर म्हणाले, ‘“माहिती म्हणजे ज्ञान नाही. सोशल मीडियावर अवलंबून न राहता अभ्यास व जीवनाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. उपलब्ध सुविधांची जाणीव ठेवून जगावे, स्वावलंबी व्हावे, जाती-धर्म-राजकारण यांचा अभ्यास देशहितासाठी करावा, गरज वाटेल ते काम निर्भयपणे करावे. संजय घोडावत शैक्षणिक संकुलमध्ये शिक्षण घेत असणारे विद्यार्थी हे नक्कीच देश हिताची कार्य करतील.’ प्रा. सोहन तिवडे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. विवेक कायंदे यांनी आभार मानले.