पाण्याच्या उपलब्धतेच्या ठिकाणांवरील उपसाबंदी उठवावी, इरिगेशन फेडरेशनची मागणी
schedule16 Jun 26 person by visibility 198 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे त्यामुळे शेतीसाठी वेळेवर पाणी देणे गरजेचे आहे. जर हे शेतकऱ्याचे पिक वाळून गेले तर त्याची वर्षभराची मेहनत वाया जावून आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पाण्याची उपल्बधता आहे अशा ठिकाणची उपसाबंदी ३० जून पर्यंत उठवावी. येथून पुढे प्रत्येक वर्षी पाण्याचे योग्य नियोजन करावे जेणे करुन शेतीसाठी पाणी किमान ३० जूनपर्यंत पुरेल याबाबत दक्षता घ्यावी.’अशी मागणी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाने, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांच्याकडे केली. याप्रसंगी कार्यकारी अभियंता ज्योती देवकरउपस्थित होत्या.
‘राज्य सरकारच्या पाटबांधरे विभागाने १५ जून-२०२६ पासून पुढील आदेशापर्यंत शेतीच्या पाण्यासाठी उपसाबंदी जाहीर केली आहे. यावर्षी महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला होता. कोल्हापूर जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस झाला होता, जिल्ह्यातील सर्वच लघु, मध्यम व मोठी धरणे पुर्ण क्षमतेने भरलेली होती. त्यामुळे यावर्षी कोल्हापूर जिल्हयासाठी शेतीसाठी पाणी टंचाई भासणार अशी परिस्थिती नव्हती. जर जिल्हयातील सर्वच लघु,मध्यम व मोठी धरणे पुर्ण क्षमतेन भरली होती तर किमान ३० जून पर्यंत सर्वच घटकांसाठी पाणी पुरले पाहिजे होते मग आत्ताच पाणी टंचाई का ? या पाणी टंचाईला जबाबदार कोण? ’अशी विचारणा केली.
अधीक्षक अभियंता पाटोळे व ज्योती देवकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणातील पाण्याची उपलब्धता व पाणीसाठ्याची माहिती घेऊन व सरकारच्याह धोरणानुसार ३१ ऑगस्ट पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करून उर्वरित पाणी शेतीसाठी देण्याचे मान्य केले. शिवाय उद्यापासून लावलेली उपसा बंदी रद्द करून तीन दिवस पाणी उपसण्यासाठी चालू करू. दूधगंगा नदीवरील परवापासून उपसा बंदी शिथिल केले जाईल असे सांगितले. शिष्टमंडळात माजी आमदार संजय घाटगे, विक्रांत पाटील-किनीकर,राजेंद्र सूर्यवंशी, प्रदीपकुमार पाटील,शरद पाटील, बाबासाहेब देवकर,भारत पाटील- भुयेकर, चंद्रकांत पाटील- पाडळीकर, सुभाष शहापुरे,सखाराम चव्हाण,इंद्रजीत पाटील-आबा,सचिन जमदाडे,सुनील मगदूम,बयाजी शेळके,चंद्रकांत पाटील,भगवान पाटील,सुरेश पाटील, जगनाथ पाटील,आत्माराम चौगले, ज्ञानदेव पाटील,महादेव सुतार, व सचिव मारुती पाटील उपस्थित होते.