महापालिकेतील रिक्त जागांच्या भरतीप्रश्नी काँग्रेस आक्रमक, गुरुवारपासून साखळी उपोषण
schedule09 Mar 26 person by visibility 43 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ कोल्हापूर महापालिकेत सतराशेहून अधिक कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे प्रशासकीय कामकाजासह शहरातील विविध कामांवर होत आहे. सेवानियमावलीची पूर्तता न केल्यामुळे रिक्त जागांची पद भरती रखडली आहे. राज्य सरकारकडून येत्या दोन दिवसात सेवा नियमावलींसंबंधी कार्यवाही न झाल्यास गुरुवारी १२ मार्च २०२६ पासून काँग्रेस व शिवसेना ठाकरे पक्षातर्फे कोल्हापूर महापालिकेसमोर साखळी उपोषण आंदोलन केले जाईल’ असा इशारा महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
आकृतीबंधनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया आवश्यक असताना गेली अनेक वर्षे हे काम रखडले आहे. जिल्ह्यातील दोन मंत्री, विधानसभेचे सगळे आमदार महायुतीचे असताना, कोल्हापूर उत्तर व दक्षिणचे आमदारही सरकारमध्ये असताना कर्मचाऱ्यांची भरती का होत नाही या मागे काय अर्थ दडला आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एकीकडे शहराची लोकसंख्या सात लाखाहून अधिक आहे, शिक्षण, नोकरी, वैद्यकीय उपचार, पर्यटन, देवदर्शन, व खरेदीसह विविध कामासाठी बाहेरगावाहून कोल्हापुरात रोज येणाऱ्यांची संख्या अडीच ते तीन लाख आहे.
शहरवासिय व बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांसाठी पायाभूत सुविधांची व्यवस्था करताना कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. इंजिनीअर, अधीक्षकासह विविध वर्गातील पदावर भरती केली नाही. नगररचना विभाग, उद्यान विभाग, स्वच्छता विभाग, घरफाळा विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभाग अशा विविध विभागात मोठया संख्येने पदे रिक्त आहेत. प्रशासन व सरकारने त्वरित कार्यवाही करावी. पावसाळा तोंडावर आहे. या साऱ्या परिस्थितीचा विचार करुन कर्मचारी भरतीची कार्यवाही त्वरित झाली पाहिजे अन्यथा आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधू.’असा इशारा त्यांनी दिला. यावेळी काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक विनायक फाळके उपस्थित होते.
………………..
शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत महापालिकेतील १७०० हून अधिक रिक्त जागांच्या भरतीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले आहे. आता रिक्त जागांच्या त्वरित भरतीसाठी काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याला राजकीय श्रेयवादाची किनार आहे का असा प्रश्न पत्रकारांनी लाटकर यांना विचारला. त्यावर लाटकर यांनी ‘गेली अडीच ते तीन वर्षे आकृतीबंध मंजुरी व भरती प्रक्रियेचा प्रश्न प्रलंबित आहे. महापालिकेत प्रशासक राजवट होती. तर राज्यात महायुतीची सत्ता आहे. आता तर महापालिकेत, राज्यातही महायुतीची सत्ता आहे. दोन मंत्री, जिल्ह्यातील विधानसभेवर निवडून गेलेले सगळे आमदार महायुतीचे आहेत. कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभेचे आमदारही सरकारचे घटक आहेत. मग महापालिकेतील रिक्त जागांच्या भरती प्रक्रियेला विलंब कशासाठी ? महायुतीने दोन दिवसात यासंबंधी कार्यवाही केली तर अभिनंदन करू. कार्यवाही न केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवू. राजकीय श्रेयवादाचा विषय नाही.’