हद्दवाढीच्या विरोधात मंगळवारी वीस गावांत बंद
schedule16 Jun 25 person by visibility 139 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रस्तावित हद्दवाढीला विरोध करण्यासाठी कोल्हापूर शहरालगतच्या वीस गावामध्ये मंगळवारी (१७ जून २०२५) रोजी बंद पुकारला आहे अशी माहिती सर्वपक्षीय कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी समितीने पत्रकार परिषदेत दिली. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांनी आपले व्यवहार बंद ठेवून सहकार्य करावे असे आवाहन समितीने केले आहे. विरोधी समितीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण, कार्याध्यक्ष उत्तम आंबवडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ अंतिम टप्प्यात आली आहे. ग्रामाीण जनतेच्या विरोधात जाऊन सरकारने कोणतीही भूमिका घेतली तर आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशाराही दिला. सरकारने जबरदस्तीने हद्दवाढ केल्यास न्यायालयीन लढाई लढू असेही त्यांनी सांगितले. हद्दवाढीला विरोध करण्यासाठी आंदोलन पुकारले असल्याचे त्यांनी सांगितले. या बंदमध्ये उचगांव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, वडणगे, गोकुळ शिरगाव, गांधीनगर, पाचगव, कळंबा, कळंबे तर्फ ठाणे, मोरेवाडी, वळीवडे, गडमुडशिंगी, पीरवाडी, आंबेवाडी, बालिंगा, नागदेववाडी, शिंगणापूर, पुलाची शिरोली, शिये, नागांव या गावांचा समावेश आहे. ‘एल्गार ग्राम रक्षणाचा’असा नारा देत हद्दवाढ विरोधी कृती समितीने बंदची हाक दिली आहे. पत्रकार परिषदेला सचिन चौगुले, तानाजी पाटील, संग्राम पाटील, श्रीधर कदम, नायकू बागणे, चंद्रकातं डावरे, अमर मोरे आदी उपस्थित होते.