एक पाऊल प्रगतीकडे, अध्यक्षांचा दौरा तालुक्याकडे ! विकासकामांचा, प्रशासकीय यंत्रणेचा घेणार आढावा !!
schedule12 May 26 person by visibility 49 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी आणि सरकारच्या योजना प्रत्यक्ष शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहेत का, याची खातरजमा करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांनी प्रत्येक तालुक्यात आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. एक पाऊल प्रगतीकडे, अध्यक्षांचा दौरा तालुक्याकडे!” या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातंर्गत त्या, प्रत्येक तालुक्यात जाऊन विकासकामांचा आणि प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेणार आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
दौऱ्याची सुरुवात १३ मे २०२६ रोजी गडहिंग्लज तालुक्यातून होत आहे. महिनाभरात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दौरा पूर्ण केला जाणार आहे. या आढावा बैठकींना जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सभापती, तालुक्यातील पंचायत समितीचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकींमध्ये विशेषतः रस्ते, पाणीपुरवठा, शाळा दुरुस्ती, आरोग्य सेवा, महिला व बालकल्याण विभागाच्या कामांचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’सह विविध शासकीय योजनांचा लाभ खरोखरच नागरिकांपर्यंत पोहोचतोय का, याची तपासणी केली जाणार आहे. ग्रामीण आरोग्य केंद्रे आणि शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबतही कडक सूचना देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, शाळांच्या इमारतींची कामे आणि आरोग्य सुविधांबाबत आता थेट अध्यक्ष स्तरावरून आढावा घेतला जाणार आहे.
“प्रशासनाने जनतेच्या दारी जाऊन काम केले पाहिजे, हीच मंत्री हसन मुश्रीफ साहेबांची भूमिका आहे. त्यांच्या सूचनेनुसार प्रत्येक तालुक्यात जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेणार असून विकासकामांना अधिक गती देणार आहोत,” अशी स्पष्ट भूमिका अध्यक्षा शिल्पा खोत यांनी व्यक्त केली आहे.