वळसंगकरांचे ग्रामपंचायत इमारतीचे स्वप्न साकारले ! गुरुवारी उदघाटन समारंभ !!
schedule28 May 25 person by visibility 344 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गेली दहा-बारा वर्षे गावात ग्रामपंचायत इमारत नव्हती. ग्रामपंचायत इमारत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय व्हायची. कर्मचाऱ्यांनाही कार्यालयअभावी कामाला अडचणी निर्माण व्हायच्या. चार-साडेचार वर्षापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक झाली. पूजा रमेश माळी यांची सरपंचपदी निवड झाली. सरपंचपदाचा कार्यभार हाती घेत असताना पाच वर्षांमध्ये ग्रामपंचायतीसाठी नवीन इमारत उभारण्याचा संकल्प केला. उपसरपंचासह इतर सदस्यांची साथ, लोकप्रतिनिधींचे पाठबळ आणि गावकऱ्यांचे सहकार्य या बळावर ग्रामपंचायतची नवीन इमारत साकारली. या नव्या इमारतीचा उद्घाटन समारंभ गुरुवारी 29 मे 2025 रोजी होत आहे.
खासदार विशाल पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते नव्या इमारतीचा उद्घाटन समारंभ होणार आहे आमदार सदाभाऊ खोत हे प्रमुख पाहुणे म्हणून तर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणार आहेत. सकाळी अकरा वाजता हा समारंभ होत आहे.
वळसंगकर गेली किती वर्ष ग्रामपंचायत इमारतीच्या प्रतीक्षेत होते. वळसंग हे जत तालुक्यातील प्रमुख गाव. तीन हजाराच्या आसपास लोकसंख्या. ग्रामपंचायतीची जुनी इमारत वापरायोग्य नव्हती. यामुळे ग्रामपंचायतचा कारभार कधी शाळेच्या खोलीत तर कधी अन्य ठिकाणाहून चालायचा. ग्रामपंचायतीचे नवीन इमारत बांधण्याचे सरपंच पूजा माळी व इतर सदस्यांनी निर्णय घेतला. गेली चार वर्ष इमारत उभारण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. यासाठी वेगवेगळ्या पातळीवर पाठपुरावा सुरू होता. ग्रामनिधीतील 18 लाख रुपये आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून दहा लाख रुपयांचा निधी मिळाला. या निधीच्या माध्यमातून ग्रामपंचायतची प्रशस्त इमारत साकारली आहे. गुरुवारी 29 मे रोजी ग्रामपंचायत इमारतीच्या उद्घाटन समारंभ होणार आहे. याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार आयोजित केला आहे. तसेच कोविड कालावधात गावामध्ये उत्कृष्टरित्या आरोग्यसेवा बजावल्याबद्दल आशा सेविकांचा सन्मान होणार आहे.
सरपंच पूजा माळी म्हणाल्या "वळसंग ग्रामपंचायतसाठी नवीन इमारत साकारत आहे, हा साऱ्या गावकऱ्यांसाठी आनंदाचा दिन आहे. सरपंच म्हणून कामकाज सुरू केल्यानंतर गावचा विकास डोळ्यासमोर ठेवून विविध योजना सुरू केल्या. आठवडी बाजार सुरू केला. पिण्याच्या पाण्याची सोय केली. लोकांना आरोग्य सुविधा पुरवल्या. ग्रामपंचायत इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. गावच्या विकासासाठी योगदान देता आले त्याचे सारे श्रेय गावकऱ्यांना आहे. गावकऱ्यांनी दिलेले साथ, नेतेमंडळींचे सहकार्य यामुळेच गावच्या वैभवात भर टाकणारी वास्तू उभा राहिली."
ग्रामपंचायत इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सरपंच पूजा माळी व उपसरपंच वंदना
निळे यांनी केले आहे.