डीवाय पाटील शिक्षण समूहातर्फे १८८ विद्यार्थ्यांना मेरीट स्कॉलरशिप
schedule17 Jan 25 person by visibility 328 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘सौ शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी निकोप स्पर्धा निर्माण होईल आणि त्यातून अधिकाधिक गुणवंत विद्यार्थी घडतील’ असा विश्वास डी. वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी व्यक्त केला.
डी.वाय पाटील शिक्षण समूहाच्यावतीने शांतादेवी डी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’ मेरीट देऊन १८८ विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. हॉटेल सयाजीच्या व्हिक्टोरिया सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास शांतादेवी डी. पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त वैजयंती संजय पाटील, स्कॉलरशिप समिती अध्यक्ष ऋतुराज पाटील, उपाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, देवश्री पाटील, डीवाय पाटील ग्रुपच्या अॅडव्हायझर पूजा ऋतुराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, आम्हाला घडवण्यात आईचे मोठे योगदान आहे. त्याकाळात आम्हा भावंडाना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा आणि मोठ्या बहिणीला शिक्षणासाठी पुण्याला पाठवण्याचा धाडसी निर्णय आईनी घेतला. आईच्या मार्गदर्शन व आशीर्वादाने आज आम्ही सर्व भावंडे आपल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवू शकलो. ऋतुराज पाटील म्हणाले, नातवंडांच्या आयुष्यात आजीचे एक वेगळं स्थान असते. आजोबा आणि माजी राज्यपाल डी. वाय. पाटील आणि आजी शांतादेवी यांना आम्ही नेहमीच दैवत मानतो. शिक्षणाचं महत्व फारसं नसलेल्या काळात आजींनी त्यांच्या सर्व मुलांना चांगलं शिक्षण मिळेल यासाठी आग्रह धरला. वात्सल्याच्या धाग्यातून त्यांनी कुटुंबाला बांधून ठेवलं. हे आमचं घरातील विद्यापीठच आहे. म्हणूनच शिक्षणाविषयी आस्था असलेल्या त्यांच्या दूरद्ष्टीचा विचार करूनच आम्ही ही शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.
समारंभात पाटील कुटुंबियांच्यावतीने केक कापून शांतादेवी डी. पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी स्कॉलरशिपप्राप्त काही विद्यार्थी व पालकांनी उत्स्फुर्तपणे मनोगत व्यक्त करत डी. वाय. पाटील ग्रुपबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रा. मधुगंधा मिठारी व प्रा. रोहिणी तुरंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. स्कॉलरशिप समितीच्या सदस्या सीएचआरओ श्रीलेखा साटम यांनी आभार मानले.