जिपचे बजेट ९६ कोटीवर, सभापती शितल यादव यांनी सादर केले आतापर्यंतचे सर्वात मोठे अर्थसंकल्प
schedule26 Jun 26 person by visibility 92 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठे अर्थसंकल्प अर्थ व शिक्षण समिती सभापती शितल प्रवीण यादव यांनी गुरुवारी, २५ जून २०२६ रोजी सादर केले. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत यादव यांनी, २०२६ २७चे प्रथम सुधारित अंदाजपत्रक मांडले. तब्बल ९६ कोटी १६ लाख २१ हजार ९४१ रुपयेचे अर्थसंकल्प आहे. शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, कृषी, महिला व बाल विकास अशा विविध घटकांसाठी तरतुदी केल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, महिला व बाल कल्याण समिती सभापती विद्या विलास पाटील, समाजकल्याण समिती सभापती श्रद्धा गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी संतोष जोशी, सभेचे सचिव व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, मुख्य वित्त व लेखाअधिकारी अतुल आकुर्डे यांच्या उपस्थितीमध्ये सभा झाली. सदस्यासाठी विकासकामाकरिता जिल्हा परिषद स्वनिधीतून दहा लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये वाढ करुन किमान वीस लाख करावेत अशी मागणी सभागृहाने केली.या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी आठ कोटी ४१ लाख ४६ हजार रुपये, कृषी विभागासाठी दोन कोटी ५० लाख ४० हजार रुपये, समाजकल्याण विभागासाठी दहा कोटी ३८ लाख ९ हजार ४८३ रुपये, दिव्यांग कल्याण विभागासाठी सात कोटी २१ लाख २९ हजार ९५८ रुपये, महिला व बालकल्याण विभागासाठी चार कोटी १४ लाख तीन हजार रुपये, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागासाठी सात कोटी ३२ लाख ८१ हजार रुपये, पाटबंधारे विभागासाठी चाळीस लाख रुपये, आरोग्य विभागासाठी तीन कोटी ४१ लाख १३ हजार रुपयांची तरतूद केली आहे. वीस संकीर्ण सर्वसमावेशक कामांसाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केल आहे. शिवाय पन्नास टक्के स्टॅप डयूटीसाठी ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी २१ कोटी ४४ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
दरम्यान सभेला सुरुवात झाल्यानंतर सदस्यांनी, अर्थसंकल्पाची प्रत मिळाली नसल्याची तक्रार केली. तसेच अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या योजनांचे आराखडे कुठे आहेत अशी विचारणा केली. स्वनिधीतील रकमेवरुन सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सदस्य एकवटले. वीस लाख रुपयांची तरतूद करण्याची मागणी केली. यावर अध्यक्षा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम समिती सभापती नांदेकर यांनी सदस्यांचा सन्मान राखला जाईल असे सांगितले.
सभेत सदस्यांनी, अंदाजपत्रक अहवालातील चुकीच्या छपाईवरुन प्रशासनाला धारेवर धरले. जिल्हा परिषदेचे सदस्य ६८ असताना ६९ सदस्य कसे छापले ? असा सवाल केला. सदस्यांना दिलेल्या ओळखपत्रासाठी चार लाख रुपयांची तरतूद केले आहे. ओळखपत्राला सोने लावले का ? अशी विचारणा केली. या सभेत भाऊसिंगजी रोडवरील जिल्हा परिषदेची इमारत निर्लेखित करुन नवीन बांधकाम करणे, जिल्हा परिषदेच्या मालकीची जमीन महापालिकेसह अन्य कोणत्याही संस्थेला न देणे असे ठराव केले. मेन राजाराम हायस्कूलची जागा करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर विकास आराखडासाठी देण्याचा ठराव नामंजूर केला.