शक्तीपीठ महामार्गविरोधात आता राज्यव्यापी आंदोलन, बांदा ते वर्धा निघणार संघर्ष यात्रा !
schedule08 May 25 person by visibility 18 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्याचा निर्धार संघर्ष समितीने घेतला. शक्तीपीठ महामार्ग हा गरज नसलेला रस्ता आहे. भ्रष्टाचाराचे ते कुरण ठरणार आहे. या महामार्गामुळे हजारो एकर शेती तर संपुष्टात येईलच शिवाय सामाजिक, पर्यावरणीय दुष्परिणाम भोगावे लागतील. यामुळे शक्तीपीठ विरोधात एकसंधपणे लढा लढू शिवाय या महामार्गाच्या विरोधात मे (२०२५) महिन्याच्या अखेरीस बांदा ते वर्धा संघर्ष यात्रा काढून लोकांना सहभागी करू घेऊ.’ असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन उभे राहील असा निर्णय संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत घेतला.
शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीने महामार्ग विरोधातील शेतकऱ्यांची, नेत्यांची ऑनलाइन बैठक घेतली. या ऑनलाइन बैठकीत बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘शक्तीपीठ महामार्ग विरोधातील संघर्ष आणखी तीव्र करू. हा केवळ शेती व शेतकऱ्यांशी निगडीत विषय नाही. तर समाजातील प्रत्येक घटकाचे शक्तीपीठ महामार्गामुळे झळ बसणार आहे. शक्तीपीठ महामार्ग म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण ठरणार आहे. समाजातील सर्व घटकांना या लढाईत सामील करुन घेण्यासाठी मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात बांदा ते वर्धा अशी संघर्षयात्रा काढली जाईल.’
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘शक्तीपीठ महामार्गामुळे सामाजिक, पर्यावरणीय, आर्थिक समस्या निर्माण होणार आहेत. महामार्गासाठी बांधण्यात येणारे पूल, टाकला जाणारा भराव यामुळे महापुराची समस्या अक्राळविक्राळ होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत एक किलोमीटरचा रस्ता तयार करण्यासाठी ३५ ते ४० कोटी रुपये खर्च होतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. मात्र शक्तीपीठ महामार्गात एक किलोमीटरसाठी एकशे दहा कोटीच्या आसपास खर्च दाखविला आहे. जादा खर्च दाखवून पैसे हडपण्याचा उद्योग दिसतो. शक्तीपीठ महामार्गला विरोध करण्यासाठी यवतमाळ ते सिंधुदुर्ग पर्यत संघर्ष यात्रा काढून प्रत्येक तालुक्यात मेळावा घेऊ.’ आमदार कैलास पाटील यांनी ‘शक्तीपीठच्या विरोधात प्रत्येक गावांनी ग्रामसभेत ठरावा करावा.’अशी सूचना मांडली. माजी आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी शक्तीपीठ महामार्गविरोधात लढा व्यापक करू असा निर्धार बोलून दाखविला. बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी, विविध संघटना पदाधिकाऱ्यांनी ऑनलाइन चर्चेत सहभाग घेतला. कोल्हापुरातून अनेकजण सहभागी झाले. आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, प्रकाश पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, बाजार समिती संचालक सुयोग वाडकर आदी उपस्थित होते.