मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे संगीत महोत्सव ! राज्यस्तरीय भावगीत - नाट्यगीत गायन स्पर्धा !!
schedule05 Jan 26 person by visibility 134 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : येथील दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित संस्थेचे माजी अध्यक्ष रसिकाग्रणी स्वर्गीय मदनमोहन लोहिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संगीतकार श्रीनिवास खळे, संगीतकार यशवंत देव व पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी निमित्त ९ ते ११ जानेवारी २०२६ अखेर सायंकाळी ५.३० वाजता संगीत महोत्सव आयोजित केला आहे. तसेच ८ ते १० जानेवारी २०२६ रोजी राज्यस्तरीय भावगीत व नाट्यगीत वयोगट ९ ते १४, १५ ते ३५ व ३६ ते ५५ (फक्त भावगीत) गायन स्पर्धेचे आयोजन संस्थेच्या राम गणेश गडकरी सभागृहात करण्यात आले आहे. मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
जास्तीत जास्त संगीतप्रेमींनी या स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करणेस सहकार्य करावे तसेच या संगीत महोत्सवाचाही लाभ घ्यावा असे आवाहन मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया यांनी केले आहे. या संगीत महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी ०९ रोजी 'शुक्रतारा' या कार्यक्रमा अंतर्गत संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांवर आधारित व शनिवारी १० जानेवारी रोजी ' गीत यशवंत' या कार्यक्रम अंतर्गत कवी व संगीतकार यशवंत देव यांच्या गीतांवर आधारित तर रविवारी, ११ जानेवारी रोजी 'स्वरसांगाती' निर्मित 'सावळाच रंग तुझा' या कार्यक्रमा अंतर्गत पद्मश्री माणिक वर्मा यांच्या गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे.
या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद जाधव, शर्वरी जाधव (मुंबई), हृषीकेश ढवळीकर (गोवा), सानिया मुंगारे (चंदगड), सावनी शेवडे - भडसावळे (रत्नागिरी), डॉ. शीतल धर्माधिकारी, गौरी कुलकर्णी, गौतमी चिपळूणकर, शर्वरी कुलकर्णी (कोल्हापूर) हे गीते सादर करणार आहेत. कोल्हापुरातील ख्यातनाम कलाकारांची साथसंगत लाभणार आहे. विशेष बाब म्हणजे अकरा जानेवारी रोजीच्या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून माणिक वर्मा यांच्या कन्या ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, डॉ. अरुणा जयप्रकाश व माणिक वर्मा यांच्या ज्येष्ठ गायिका श्रीमती शैला दातार या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना डॉ. शीतल धर्माधिकारी व प्रसाद कुलकर्णी यांची आहे.
रसिकाग्रणी मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचातर्फे सलग १२ व्या वर्ष ही स्पर्धा वय वर्षे ९ ते १४, १५ ते ३५ व ३६ ते ५५ (फक्त भावगीत) या वयोगटांअंतर्गत होणार आहे. स्पर्धेसाठी २०० रुपये प्रवेश फी आकारण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना वय वर्षे ९ ते १४ या वयोगटांना अनुक्रमे पाच हजार रुपये, तीन हजार रुपये व दोन हजार रुपये तर ३ १५ ते ३५ वर्षे वयोगटासाठी अनुक्रमे दहा हजार, सात हजार व पाच हजार रुपये बक्षीस देऊन गौरविले जाईल. ३६ ते ५५ या वयोगटासाठी भावगीतासाठी अनुक्रमे दहा हजार, सात हजार आणि पाच हजार रुपये अशी रोख बक्षिसे, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक गटासाठी २ उत्तेजनार्थ बक्षिसे तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे संस्थेचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे यांनी सांगितले. यावेळी सहसचिव प्राचार्य एस. एस. चव्हाण , डॉ. शितल धर्माधिकारी ,प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.